सामाजिक

केंद्रीय मंत्री गडकरींच्या दौऱ्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या विकासाला चालना !

राजकीय नेत्यांना सबुरीचा सल्ला !
 अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवार दिनांक १४ मे रोजी अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध रस्ते विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यामुळे विकासाला मोठी चालना मिळाली असून यावेळी राजकीय नेत्यांना नितीन गडकरी यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिनांक १४ मे रोजी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे २ हजार ७८४  कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या पाच प्रकल्पांचे ऑनलाईन भूमिपूजन केले. यामध्ये हसापूर ते बडदाळ सहापदरीकरण करणे , वागदरी -अक्कलकोट – तोळनूर दुपदरीकरण करणे , मोहोळ – बसवनगर – वळसंग दुपदरीकरण करणे , दुधनी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे , बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठे पूल बांधणे या कामांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अक्कलकोट नवीन बस स्थानक येथे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  भव्य अशा  कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अपेक्षाप्रमाणे नितीन गडकरी यांनी अत्यंत मुद्देसूद मांडणी करत विकासाचा लेखाजोखा मांडला. सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक लाख कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे ही येत्या तीन वर्षात होणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच अक्कलकोट तालुक्यातून जाणारा सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे अक्कलकोट तालुक्याचा विकास झपाट्याने होणार आहे. अक्कलकोट तालुक्यात रस्ते विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात या तालुक्याचा कायापालट होणार आहे .कृषी सह पर्यटन या क्षेत्रांचा विकास हा महामार्गामुळे होणार आहे असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
‘प्रधानमंत्री गती शक्ती’ मास्टर प्लॅन अंतर्गत विकसित होत असलेल्या सुरत-चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा एक प्रमुख घटक राष्ट्रीय महामार्ग-१५० सी अंतर्गत हसापूर ते बडादल दरम्यानचा प्रस्तावित सहा-पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर. हा आधुनिक कॉरिडॉर महाराष्ट्र आणि कर्नाटकला अधिक प्रभावीपणे जोडेल, ज्यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. सुरत आणि चेन्नई दरम्यानचे अंतर सुमारे ३९० किलोमीटरने कमी झाल्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि व्यावसायिक घडामोडींना चालना मिळेल. एक्सेस कंट्रोल्ड प्रणालीवर आधारित हा महामार्ग अत्याधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार विकसित केला जात आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे २८ तासांवरून १७ तासांपर्यंत कमी होईल. शिवाय, सुधारित वाहतूक व्यवस्थापन आणि कमी झालेले कार्बन उत्सर्जन पर्यावरण संरक्षणाला चालना देईल. पर्यावरणीय संतुलन आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन, वनक्षेत्रातील वन्यजीवांच्या सुरक्षित हालचाली सुनिश्चित करण्यासाठी, तसेच वन्यजीवांची सुरक्षा आणि विना अडथळा वाहतूक प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी विशेष वन्यजीव निवारण संरचना देखील बांधल्या जात आहेत. हा आर्थिक कॉरिडॉर वस्त्रोद्योग केंद्रे, औद्योगिक समूह, मेगा फूड पार्क्स आणि औषध निर्माण व वैद्यकीय क्षेत्रासह विविध विकास केंद्रांना जोडून नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल. विमानतळ, बंदरे आणि इतर वाहतूक जाळ्यांशी सुधारित जोडणीमुळे या प्रदेशाची औद्योगिक आणि व्यावसायिक क्षमता आणखी मजबूत होईल.

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या परगावच्या स्वामी भक्तांना रस्ते विकासामुळे प्रवास करणे सुखकर होणार आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सर्वांना सहकार्य करणाऱ्या स्वभावाचा उल्लेख करत राजकारणातील चाललेल्या स्पर्धेबद्दल नाराज व्यक्त केली. नितीन गडकरी यांच्या स्वभावामुळे ते सर्वसमावेशक नेते वाटतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही न्याय देण्याची भूमिका नितीन गडकरी नेहमीच घेत असल्याने त्यांना दिल्लीत भेटताना आपलेपणा जाणवतो असे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. हाच धागा पकडत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मी विकास कामांमध्ये राजकारण करत नाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता काम करत असतो. माणूस हा जातीने मोठा होत नाही तर तो गुणवत्त्याने मोठा होत असतो.राजकारण हे जनसामान्यांच्या सेवेचे माध्यम आहे सत्ताही लोकांची कामे करण्यासाठी असते शेवटी या देशातील जनता श्रेष्ठ आहे असे सर्वच उपस्थित रजकीय नेत्याना सांगितले. विकास कामात राजकारण करू नये असा सबुरीचा सल्ला ना. नितीन गडकरी यांनी राजकीय मंडळीना दिला.अक्कलकोट विधानसभा क्षेत्राचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट दुधनी गाणगापूर या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले. या मागणीला नितीन गडकरी यांनी तात्काळ होकार दिला असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले.अक्कलकोट तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा हा अत्यंत फलदायी ठरला असून या दौऱ्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन हे सर्वच राजकीय नेत्यांना मंथन कराव्यास लावणारे असून राजकारणात केवळ सत्ताही महत्त्वाची नसून जनसेवा ही तितकीच महत्त्वाची आहे असा सल्लाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याने याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button