राज्यातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने बिगुल वाजवला आहे. या १६ जागांवर द्विवार्षिक निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. यासाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया २५ मे २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी करून सुरू होईल. त्यानंतर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ०१ जून २०२६ पर्यंतचा वेळ देण्यात आला असून हीच नाव नोंदणीची शेवटची तारीख असेल. दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी ०२ जून २०२६ रोजी केली जाईल, तर उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी ०४ जून २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, या १६ जागांसाठी १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. मतदानानंतर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल स्पष्ट होतील आणि २५ जून २०२६ पर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


