SIR प्रक्रियेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे करडी नजर; कोणतीही चूक वा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही : खासदार प्रणिती शिंदे

शेतीसाठी भीमा नदीच्या पाण्याच्या आवर्तनावर अन्याय सहन करणार नाही; पंढरपूरातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू : खासदार प्रणिती शिंदे
पंढरपूर : – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील चळे व आंबे या गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच नागरिकांकडून विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली. गावभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील विकासकामांची स्थिती, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या अपेक्षा आणि अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. चळे व आंबे येथील ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आपुलकी ही अधिक जोमाने जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा देणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामस्थांनी भीमा नदीच्या पाण्याच्या आवर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वी उन्हाळी हंगामात नदीचे पाणी चार आवर्तनांमध्ये मिळत होते; मात्र यंदा केवळ दोनच आवर्तने देण्यात आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पाऊस लांबल्यामुळे शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वीप्रमाणे नियमित आवर्तने देण्यात यावीत आणि योग्य नियोजन करून सर्व आवर्तने वेळेवर सोडावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शेतकरी आणि नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. शासन आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पूर्वीप्रमाणे भीमा नदीच्या पाण्याची नियमित आवर्तने सुरू करावीत. अन्यथा पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष उभारावा लागेल. या लढ्यात सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
गावभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी विशेष मतदारयादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत सुरू असलेल्या घरभेटींनाही भेट देत मतदारांशी आणि BLO, BLA यांच्याशी संवाद साधला. त्यांनी SIR प्रक्रियेची माहिती घेत पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, प्रत्येक पात्र मतदाराने SIR चा अर्ज भरून अंतिम मतदारयादीत आपले नाव कायम राहील याची खात्री करून घ्यावी. कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची माहिती अचूक आणि पूर्ण स्वरूपात सादर करावी. शिक्षण, नोकरी किंवा अन्य कारणांमुळे स्थलांतर झालेल्या नागरिकांनी, तसेच नियमित मतदान करणाऱ्या मतदारांनीही ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
एसआयआर मोहिमेद्वारे निवडणूक आयोगाचे अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. दुबार नावे वगळणे, नव्या मतदारांची नोंद करणे, पत्ता बदल, नावातील व जन्मतारखेतील त्रुटी दुरुस्त करणे तसेच मृत मतदारांची नावे वगळणे, या प्रक्रियेमुळे मतदारयादी अधिक अचूक व अद्ययावत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लोकशाही बळकट ठेवण्यासाठी मतदारयादी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कोणत्याही पात्र आणि खऱ्या मतदाराचे नाव अन्यायाने वगळले जाणार नाही, यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सतर्क आहे. काँग्रेसचे BLA आणि कार्यकर्ते प्रत्येक बूथवर नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करतील.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावे वगळल्याचे गंभीर आरोप झाले. देशात अत्यंत घाणेरडे आणि धोकादायक राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे SIR प्रक्रियेवर काँग्रेसचे कार्यकर्ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली होणारी कोणतीही चूक किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी काँग्रेस शेवटपर्यंत संघर्ष करेल.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप पाटील, सादीक मुलानी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, नितीन शिंदे, आंबेच्या सरपंच सौ. प्राजक्ता सावंत, अशोक शिंदे, राजाराम सावंत, दिलीप कोळी, साहिल शेख, भैय्या वाघाटे, संजय ताड, बाळासाहेब शिंदे, गोविंद शिंदे, चळेचे माजी सरपंच विठ्ठल मोरे, संतोषकुमार गायकवाड, युवराज मोरे, कुणाल मोरे, बंडू मोरे, सुनील गायकवाड, रणजीत मोरे, प्रताप गायकवाड, अविनाश मोरे, बालाजी फुगारे, अजित खिलारे यांच्यासह आंबे व चळे येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



