सामाजिक

दुःखावर मात करून छोट्या गोष्टींमधून आनंद शोधा अन् आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा – प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )- आनंदाने जीवन जगण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळा, आवडत्या छंदबरोबरच कुटुंबाबरोबर संवाद साधा, चांगले मित्र-मैत्रीणी जोडा, नवीन अनुभव घ्या, इतरांना मदत करा आणि कृतज्ञ राहा, असे अनेक उपाय असून आनंद हा एक सतत मिळणारा अनुभव आहे. दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला येते, पण त्यावर मात करून छोट्या गोष्टींमधून आनंद शोधा अन् आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा’ असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी ( सोलापूर ) यांनी केले. 
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालय व अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशोत्सवानिमित्त  यंदाच्या पहिल्या वर्षी आयोजित व्याख्यानातील ‘चला आनंदी जीवन जगू या ’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना प्रा. कलशेट्टी बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, प्र. प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले,उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, उपाध्यक्ष श्रीमंत बुक्कानुरे, सचिव दत्तात्रय होटकर, संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जीवनात जन्मदात्या आई – वडिलांना विसरू नका असे सांगून प्रा. कलशेट्टी पुढे म्हणाले, जीवनात आनंदी राहणे खूप सोपे आहे. पण आनंद स्वतः उपभोगण्यापेक्षाही तो जगाला दाखविण्यासाठी माणसे केविलवाणी धडपड करतात. बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. निसर्गापुढे माणूस खूप क्षुल्लक आहे, ही बाब कोविडने आम्हाला शिकवली. त्यामुळे निसर्गासोबत स्वतःला जुळवून घ्या. जात, धर्म, पंथ विसरून समाजाशी नाते जोडा. डोळ्यांत प्रेम अन् हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून जगता येणार नाही. जीवनात पैसा महत्त्वाचा असला तरी नाती जपायला शिका आणि मोबाईल पासून अलिप्त राहून कुटुंबाबरोबर जास्त वेळ संवाद साधा. मन व मनगट तंदुरुस्ती ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावे. पौष्टिक आहार बरोबरच पुरेशी विश्रांती घेतल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल. दररोज नवनवीन कामांमध्ये सहभागी झाल्यावर आनंद आणि ऊर्जा मिळते. समाजात चांगले संबंध निर्माण करा. विशेष म्हणजे कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवा. इतरांशी चांगले संबंध ठेवल्याने जीवनात आनंद आणि आधार मिळतो. कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्येकानी आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार माना. लहानसहान गोष्टींसाठी कृतज्ञ राहिल्याने समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच  गरजू लोकांना मदत केल्याने आणि परोपकार केल्याने खूप समाधान आणि आनंद मिळतो. यासाठी प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या. जीवनातील लहानसहान क्षणांचा आनंद घ्या. रोजच्या जीवनातील छोट्या विजयांचेही स्वागत करा. नकारात्मक विचारापासून दूर राहून सकारात्मक विचार करा. या सकारात्मक विचारांनी आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ शकता आणि जीवनातील नकारात्मकता कमी करू शकता, असेही बोलताना सांगितले.
प्रारंभी या व्याख्यानमाला चे उद्घाटन माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी श्रीमती शोभा खेडगी म्हणाले, 
महाविद्यालय आणि पतसंस्थेच्या संयुक्त आश्रयाने आयोजित या बौद्धिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि विचार यांची संस्कार मिळणार आहे. या व्याख्यानमालेतून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवावी, हाच आजचा संदेश   असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी महाविद्यालय सेवकांची पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला व्याख्यानमालेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्तेंचा परिचय प्रा. निलेश भरमशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर थोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विजया कोन्हाळी यांनी केले. या व्याख्यानमालेस महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी -विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button