अक्कलकोट बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य, अबालवृद्ध प्रवाशांचे अतोनात हाल !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट बस स्थानक परिसरात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून अबालवृद्ध प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाचे अक्कलकोट बस स्थानकातील सोयी सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांसह नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट नगरी ही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची नगरी म्हणून ओळखली जाते. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त हे अक्कलकोट तीर्थक्षेत्री बसद्वारे येत असतात. तसेच स्थानिक प्रवासी , ग्रामीण भागातील प्रवासी ,शालेय विद्यार्थी , वयोवृद्ध प्रवासी हे अक्कलकोट बस स्थानकातून एसटी बस द्वारे प्रवास करत असतात. हजारो प्रवासी वर्गाचे वर्दळ असणारे अक्कलकोट बस स्थानकात सलग नऊ दहा दिवसांपासून पाऊस पडत असल्याने सर्वत्र चिखल चिखल साचले आहे .बस स्थानकाच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून या चिखलातूनच अबालवृद्ध प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे. अक्कलकोट बस आगार प्रमुखांना प्रवासांचे होणारे हाल दिसत नाहीत का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्कलकोट बस स्थानक परिसरातून लहान मुले , महिला , वयोवृद्ध प्रवासी , अपंग प्रवासी यांना चालताच येत नाही. इतकी भीषण परिस्थिती असताना एसटी बस स्थानकातील अधिकारी काय करत आहेत हेच कळत नाही. वास्तविक पाहता अक्कलकोट बस स्थानक परिसरात मुरूम , खडी टाकून खड्डे बुजून प्रवाशांना रस्ता करून देणे अपेक्षित आहे. पण साधे मुरूम टाकून बस स्थानक परिसर व्यवस्थित करण्याचे का टाळले जात आहे. प्रवाशांना मुद्दाम त्रास देण्यात येत आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे परगावचे भाविक हे बस स्थानकातील परिसर पाहून कपाळावर हात मारून घेत आहेत. आपण नेमके तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आहोत का? असा सवाल उपस्थित करत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने अक्कलकोट बस स्थानक परिसरातील चिखलावर कायमचे उपाययोजना करावी अशी मागणी परगावच्या व स्थानिक प्रवासी वर्गातून केली जात आहे.



