सिना नदीला मागील वर्षी आलेल्या महापूरात बाधीत झालेल्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही

माढा (प्रतिनिधी):
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माढा तालुक्यात सिना नदीला आलेल्या महापुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी, पशुधन यांसह छोट्यामोठ्या व्यावसायिकांचेही अतोनात नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे देखील केले होते. मोठमोठ्या नेतेमंडळींनी भेटी देऊन भलीमोठी आश्वासने देखील दिली होती. परंतु, जसा महापूर ओसरला तसा प्रशासनासह नेतेमंडळींना देखील विसर पडला. आणि, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली. याच्या निषेधार्थ आज रोजी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शाहुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माढा तहसील कार्यालयात तहसीलदार संजय भोसले यांच्याकडे एक निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. तात्काळ कार्यवाही नाही झाल्यास युवक काँग्रेस संगठनेच्यावतीने गांधीगिरी मार्गाने मोठे लोकआंदोलन उभे करण्याचा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला. याठिकाणी सिना नदीकाठच्या दारफळ, उंदरगाव, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, सुलतानपूर, तांदुळवाडी, रिधोरे, पापनस, लव्हे, चव्हाणवाडी, इत्यादी गावांतील अनेक पूरग्रस्त शेतकरी व व्यावसायिक हेदेखील चर्चेसाठी आवर्जून आले होते.
याप्रसंगी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शाहुराजे जगताप, प्रदेश सचिव समाधान लटके, सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, विधानसभा उपाध्यक्ष सुर्यकांत लोंढे, विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस बालाजी मुजमुले, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष जमीर काझी, उपाध्यक्ष जमीर सय्यद, बाबासाहेब ओहोळ, भारत खंडाळे, दत्तात्रय सावंत, आनंद जगताप, वैभव पांढरे, महेश आवताडे, मनोज वायचळ, अभंग साळुंखे, सुरेश पिसाळ, जालिंदर धर्मे, भारत शिंदे, शिवाजी शिरसाट, नितीन शिंदे यांच्यासह सिना नदीकाठचे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.



