सामाजिक
सोलापूर जिल्ह्यात एक लाख कोटी रुपयांची रस्त्याची कामे पूर्ण करणार – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यात रस्ते विकासाची ३४ कामे मंजूर असून १५ कामे पूर्ण झाली आहेत. तर १९ कामे प्रगतीपथावर आहेत. आता २ हजार ७८४ कोटी रुपयांच्या पाच नव्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे. या रस्ते विकासाच्या कामामुळे सोलापूर शहर जिल्ह्याचा चेहरा बदलणार असून सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. यात पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात एक लाख कोटी रुपयांची रस्त्याची कामे पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार तर्फे सोलापूर जिल्ह्यातील हसापूर ते बडदाळ ग्रीनफिल्ड सहापदरीकरण करणे , वागदरी – अक्कलकोट तोळणूर रस्त्याचे दुपदरीकरण करणे , मोहोळ – बसवनगर वळसंग रस्त्याचे दुपदरीकरण करणे , दुधनी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे , बोरी उमरगा येथे बोरी नदीवर मोठा पूल बांधणे या कामांचे ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अक्कलकोट शहरातील नवीन बस स्थानक प्रांगणामध्ये पार पडला.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे , राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे , कर्नाटक आळंदचे आमदार बी. आर. पाटील , आमदार सुभाष देशमुख , आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार विजयकुमार देशमुख , आमदार देवेंद्र कोठे , आमदार समाधान आवताडे , आमदार राजू खरे , जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजीत पवार ,सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल ,जिल्हा परिषद सभापती रामाप्पा चिवडशेट्टी , दक्षिण पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे ,अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , नगरसेवक महेश इंगळे , अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले ,माजी आमदार राजन पाटील ,राजेंद्र राऊत , मैंदर्गी नगराध्यक्ष अंजली बाजारमठ , अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी , जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैन आदींसह विविध मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले ,दिल्लीत गेल्यापासून सोलापूरला येणे कमी झाले. राज्याचा मंत्री असताना तसेच पक्षाचा राज्य अध्यक्ष असताना सोलापूरला मी कायम येत होतो .माझी आई पंढरपूर , अक्कलकोट , गाणगापूर येथे दर्शनासाठी येत असे. त्याकाळी या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. माझ्या आईने मला या रस्त्यांच्या विकासासाठी सांगितले होते. योगायोगाने मी रस्ते वाहतूक मंत्री झाल्यामुळे आईचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मनस्वी आनंद होत आहे. २०१४ नंतर देशात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात ५२ हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांची घोषणा मी करत आहे. त्यातील अनेक कामे ही पूर्ण केली आहेत याचे समाधान वाटत आहे. सोलापूरसाठी नव्या रिंगरोडच्या मागणीला मान्यता देत आहे. यावेळी सोलापूर शहरातील जड वाहतुक कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. १ हजार २०० कोटी रुपये किमतीचा पालखी मार्ग पूर्ण केला आहे. यामुळे वारकरी बांधवाना पंढरपूरला जाणे सोपे झाले आहे. जनताही परमेश्वरासारखी आहे मी खोटी आश्वासने कधीच देत नाही असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
सुरत – चेन्नई या महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलणार आहे. सोलापूर , अक्कलकोट ही शहरे देशाच्या मध्यभागी येणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे. अक्कलकोट – दुधनी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर करू तसेच गाणगापूरचा रस्ता दुरुस्त करू यामुळे परगावच्या भाविकांना दर्शनासाठी जाणे सुलभ होणार आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले .मी विकास कामांमध्ये राजकारण करत नाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता काम करत असतो. माणूस हा जातीने मोठा होत नाही तर तो गुणवत्त्याने मोठा होत असतो. छत्रपती शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले हे कोणत्या जातीचे महापुरुष नाहीत ते देशाचे महापुरुष आहेत असे सांगत नितीन गडकरी यांनी शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार आहे. हायड्रोजन तयार करणार आहे. हायड्रोजन बनविण्यात यशस्वी झालो तर देशाचे २२ लाख कोटी रुपये वाचतील. या देशातील गरिबी , बेकारी दूर झाली पाहिजे. भूकमारी कमी झाली पाहिजे. आपल्या देशात मोठी ताकत आहे. देशाला शक्तिशाली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बळीराजा समृद्ध झाला पाहिजे हा ध्यास घेऊन काम सुरू आहे. एक लाख कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्यानंतर सोलापूरचा सर्वांगीण विकास होणार आहे. प्रत्येकाचा सुखांक वाढला पाहिजे. सत्ताकारण महत्त्वाचे नसून जनसेवा महत्त्वाची आहे असे यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले , स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर अक्कलकोट तालुक्याला सहा नॅशनल हायवे मंजूर झाले आहेत. या सर्व नॅशनल हायवे कामे ही प्रगतीपथावर आहेत. पूर्वी सोलापूरला जाण्यासाठी एक तास लागत असे आता वीस मिनिटात सोलापूरला जाता येते. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी परगावचे भाविक भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोटला येत असतात. रस्ते विकासामुळे भाविक भक्तांना अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येण्यास कमी वेळ लागत आहे .याचे सर्व श्रेय हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाते. अक्कलकोट तालुक्यात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. अक्कलकोट तालुका हा राज्याचा शेवटचा तालुका असून या तालुक्याचा विकास हा केंद्र सरकार मुळे मोठ्या प्रमाणात होत आहे .राज्यभरात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अक्कलकोट शहरात स्वामी भक्तांची संख्या ही दहा पटीने वाढली आहे. अक्कलकोटचे अर्थकारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे बदलले आहे असे सांगत अक्कलकोट गाणगापूर दुधनी रस्ता पुनर्बांधणी करण्यात यावा ही मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्लीमध्ये एकमेव मंत्री नितीन गडकरी यांचे दरवाजे हे सर्वांसाठी उघडे आहेत. सध्याचे राजकारण पाहता विरोधकांना सन्मानाची वागणूक ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यांच्याकडून मिळत असते. नितीन गडकरी यांच्या स्वभावामुळे मी तुमच्यापर्यंत येत असते. तुम्ही सर्वांना न्याय देत असता असे सांगत ज्या गावाजवळ रस्ता बनत आहे त्या ठिकाणी फ्लाय वेअर झाला पाहिजे तसेच अंडरग्राउंड रस्ता झाला पाहिजे ही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले.या कार्यक्रमास नगरसेवक यशवंत धोंगडे , महेश हिंडोळे ,तम्मा शेळके , भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण , सिद्धाराम टाके ,उपनगराध्यक्ष बंटी राठोड , सुरेश नागुर ,वर्षा पटणे , आप्पासाहेब पाटील ,सातलिंग परमशेट्टी , महेश बिराजदार , भाजपा मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील , सुनील खेड , महादेव पाटील , अमोल हिप्परगी , रणजीत शिंदे आदिसह भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच नागरिक व भारतीय रस्ते विकास प्राधिकरणाचे अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅशनल हायवेचे सचिव एस . जी. शेलार यांनी केले.




