ऊस पिकाच्या नुकसानीबाबत काँग्रेसकडून कुर्डूवाडी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

माढा – अतिवृष्टी आणि, महापुरामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या ऊस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऊसाचे पिक पाण्याखाली गेल्यामुळे ते जमिनीवर झोपलेले अन् पडलेले आहे. त्यामुळे त्या ऊसाचे वजन घटणे व, ऊसाला उंदीर लागणे ह्या कारणाने उत्पादक शेतकरी आणखीनच अडचणीत येवू शकतो. १ नोव्हेंबर तारखेपासून महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखाने चालू होणार आहेत. याकरिता सोलापूर जिल्ह्याच्या विशेषतः माढा, करमाळा, मोहोळ ह्या तालुक्यांतील साखर कारखानदारांनी ज्या उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पडलेला आहे तो प्राधान्यक्रमाने तोडणी करून न्यावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे तसेच; सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या आदेशाने काल रोजी माढा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व, कार्यकर्ते मिळून प्रांत अधिकारी कार्यालय – कुर्डूवाडी येथे प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक चोपडे, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन खैरे-पाटील, राजीव गांधी पंचायती राज संगठनेचे तालुकाध्यक्ष संदिप मोरे, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष रमेश रणदिवे, शहर सचिव निलेश गवळी, शहर उपाध्यक्ष जयकुमार काळे, आदी पदाधिकारी याठिकाणी उपस्थित राहिले होते.



