सामाजिक
अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून विनापरवाना बांधकाम केलेल्या तसेच नियमबाह्य बांधकाम केलेल्या सर्वच बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले.
अक्कलकोट शहरात मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवाना इमारती व दुकानांचें बांधकाम करण्यात आलेले असून याचाच भाग म्हणून अक्कलकोट नगर परिषदेकडून दिनांक २ ऑगस्ट रोजी बस स्थानका मागील ४९ गाळे विना परवाना बांधकाम म्हणून अतिक्रमण काढण्यात आले. तसेच शहरातील इतर ठिकाणची जवळपास ४१ अतिक्रमण केलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. जवळपास ९० अतिक्रमण केलेल्या दुकानांवर व इमारतींवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत अक्कलकोट शहरातील अतिक्रमण विरोधात सर्वात मोठी कारवाई म्हणून याकडे पाहण्यात येते. याबाबतची माहिती देताना अक्कलकोट नगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी यापुढील काळामध्ये अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत , विनापरवाना बांधकामांवर अक्कलकोट नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.अक्कलकोट शहरात परगावच्या भाविकांसाठी राहण्यासाठी भक्तनिवास तसेच लॉज ची मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले आहेत. अनेक लॉज आणि भक्तनिवास इमारतीच्या पार्किंग मधील गाळे काढण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्यात आले नाहीत. अशा नियमबाह्य भक्तनिवासांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले .तसेच अक्कलकोट शहरातील अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ६० गाळे हे विनापरवाना बांधकाम करण्यात आले असून त्या गाळ्याच्यां कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जर दोषी आढळल्यास ६० गाळ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हत्ती तलाव परिसरातील रस्ते रुंदीकरणामधील ५५ घरांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच अक्कलकोट शहरातील घाण टाकी परिसरातील ४५ विनापरवाना बांधकाम केलेल्या घरांना नोटीस देण्यात आली आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील जागांवर विनापरवाना बांधकाम करण्यात आलेल्या सर्वच घरांना नगरपालिकेमार्फत नोटीस देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली .अक्कलकोट शहरातील अतिक्रमण हे टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे. नागरिकांच्या जशा तक्रारी प्राप्त होतील त्याप्रमाणे अतिक्रमणावर नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत अतिक्रमण मोहिमेवर १५ लाख रुपये खर्च झाला आहे हा खर्च हा खर्च पाडकाम खर्च वकिलांचा खर्च पोलीस बंदोबस्त खर्च जेसीबी खर्च कोर्टात येण्या जाण्याचा भत्ता इत्यादी सर्व खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. तसेच भूसंपादनासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडे निधी उपलब्ध करून देणार का याची विचारणा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. अक्कलकोट शहरात आतापर्यंत अतिक्रमण विरोधात मोठी मोहीम नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली असून आगामी काळात अक्कलकोट शहरातील अवैधरित्या तसेच विनापरवाना बांधकाम केलेल्या सर्वच दुकानांवर तसेच इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे विनापरवाना बांधकाम केलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.



