राजकीय
कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार :मल्लिकार्जुन पाटील

अक्कलकोट, ( प्रतिनिधी ) : गेल्या अनेक दिवसापासून अक्कलकोटच्या राजकीय स्थितीमध्ये अनेक स्थित्यंतरे घडण्याची शक्यता निर्माण झाली असता योग्य ते निर्णय घेण्याची वेळ जेव्हा माझ्यावर आले तेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यांबरोबर आणि गावकरी बांधवाबरोबर चर्चा करून आणि स्वतः विचार करून काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्धार केल्याचे माजी जि. प.कृषी आणि पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी स्पष्ट केले. अक्कलकोट विधानसभेचे चार वेळा आमदार राहिलेल्या आणि एकदा मंत्री म्हणून काम पाहिलेले सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेस पक्षाचा त्याग करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला असून तो उद्या गुरुवारी तो प्रवेश सोहळा संपन्न होत आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून काँग्रेसची चळवळ गावागावात आणि घराघरात रुजलेले असून काँग्रेसचे अनेक नेते देशाच्या स्वातंत्र्यात जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन देशाची एकता आणि अखंडता टिकवलेले आहे. तोच विचार डोक्यात घेऊन मी आणि माझे समर्थक आणि मित्रपरिवार हे काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्धार केलेला असून त्यातून काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. सिद्धाराम मैत्री यांच्या खंदे समर्थक असलेले मल्लिकार्जुन पाटील हे त्यांच्यासोबत शिवसेनेत जातील असे अनेकांना वाटत होते पण त्यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे नेण्याचा निर्धार करून काँग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी विचार विनिमय करून येत्या काळात त्यांच्या संपूर्ण सहकार्य घेऊन अक्कलकोटचा विकास आणखी पुढे नेण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करून काँग्रेसमध्येच राहून सामाजिक आणि राजकीय कारकीर्द यशस्वी करण्यासाठी जिद्दीने येत्या काळात कामाला लागणार असल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले. मल्लिकार्जुन पाटील हे स्वतः काँग्रेस पक्षात राहत असताना इतकी वर्षे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहणारे आपले सर्व सहकारी आणि मित्रपरिवार आणि गावकरी या सर्वांना सुद्धा काँग्रेसमध्येच राहून तालुक्याचा विकास करत असताना आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहावे असे आवाहन देखील केले.