आमदार राजेश पवार यांच्या स्वखर्चातून नायगाव बैलबाजारात पाण्याच्या कुंड्या

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )
उन्हाळा लागला कि पाण्याचे दुर्भिक्ष्य असतेच! त्यातही आपल्या मराठवाड्यात नैसर्गिकरित्या उन्हाळ्यात वाढणारी पाणी टंचाई ही मोठी समस्या आहे.
याच अनुषंगाने साधारणत: सहा वर्षांपासून सातत्याने प्रतिवर्षी, संवेदनशीलतेने नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार हे नायगाव आणि उमरी येथील जनावरांच्या आठवडी बाजारात स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याची सोय करत असतात. नायगाव तालुक्यासह बाहेरुन येणाऱ्या जनावरांसाठी पाण्यासाठी लागणारी टाक्यांची उपलब्धता, स्वच्छ पाणी आणि विशेष म्हणजे टाकीची वारंवार स्वच्छता आदी बाबींची विशेष काळजी घेतली जाते. उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्यामुळे यावर्षीही मार्चच्या अगदी सुरुवातीलाच ती सोय आमदार राजेश पवार यांच्या वतीने नायगाव बैल बाजारात करण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीची तहान भागवल्यानंतर मिळणाऱ्या व एखाद्या मोठ्या दानाने मिळणाऱ्या पुण्याहूनही मला या मुक्या प्राण्यांचे घेतलेले आशीर्वाद महत्त्वाचे वाटतात, म्हणूनच हा सेवायज्ञ प्रतिवर्षी सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. असे मत आमदार राजेश पवार यांनी व्यक्त केले आहेत.