तीनवेळा आमदारकीची संधी दिली, यानं आमची पोरं देशोधडीला लावली! – डॉ तानाजीराव सावंत

परडा ( फारुक शेख )
भूम परंडा वाशी येथील मतदान संघांतील – ईटमधील जाहीर सभेतून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे माजी आमदार राहुल मोटेंवर जोरदार टीकास्त्र- विधानसभेत यानं कधी तोंड उघडलं नाही; शिवाजीअण्णा भुईटेंचीही जोरदार टीका- तू बचत गटाला मदत केल्याचं दाखव, नवर्याची एका महिन्याची पगार बक्षीस देते; अर्चना दराडेंनी मोटेंच्या पत्नीला ठणकावले!
ईट – विकास कामं करायची असेल तर झटावं लागतं, निधी आणण्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते, मंत्रिमंडळात वजन असावं लागतं. याला तीनवेळा आमदारकीची संधी दिली तर यानं आमची पोरं देशोधडीला लागली. हा बॅनरवर पाण्याचे फोटो छापत बसला, पण पाणी काही आणलं नाही, ते सावंत यांनीच दोन वर्षात आणलं. येत्या गुढी पाडव्याच्या आसपास ‘उजनी’चे पाणी सीना कोळेगाव धरणात पडणार म्हणजे पडणारच आहे. गोदावरी खोर्याचं उपाध्यक्षपद होतं, डोक्यावर लालदिवा होता त्याच्याकडे, तरी तो पाणी का आणू शकला नाही? अशा शब्दांत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. ईट, ता. भूम येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहाता, तानाजीराव सावंत हे मोठ्या लीडने विधानसभेत पोहोचतील, याची खात्रीच पटली होती.
आपल्या घणाघाती भाषणात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, की मी २०१९ला दिलेले पाणी आणण्याचे वचन पूर्ण होत आहे. येत्या गुढी पाडव्याच्या आसपास आपल्या हक्काचे पाणी सीना कोळेगाव धरणात पडणारच आहे. ज्या रस्त्यासाठी बजेट टाकता येत नाही, ते रस्ते भैरवनाथ कारखान्याच्या माध्यमातून स्वखर्चाने केले. तू एखाद्या रस्त्यावर कधी मुरूमाची पाटी तरी टाकली आहे का? ईटसाठी १९ ते २० कोटींचा निधी दिला आहे. आपणाला या भागाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर आपले मोठे नुकसान होणार आहे. यांचे २५ वर्षांचे राजकारण मला मान्य नाही. लोकशाहीत वारसाने सत्ता चालविण्याला स्थान नाही, हे बाबासाहेबांनी लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलाही गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाला अनमोल असा मताचा अधिकार दिला आहे. मतदानाचा हक्क काळजीपूर्वक वापरून मला लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवा. विकासाची ही प्रक्रिया आता कुठल्याही परिस्थितीत थांबायला नको, असे आवाहनही प्रा. डॉ. सावंत यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीअण्णा भोईटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, बाजार समितीचे सदस्य प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर गिते, बाळासाहेब क्षीरसागर यांचीही घणाघाती भाषणे झालीत. त्यांनी विरोधकांवर चांगलेच टीकेचे आसूड ओढले. गोरगरीब, शेतकरी यांच्या कल्याणासाठी व आपल्या भागाचा विकास घडवून आणण्यासाठी तानाजीराव सावंत यांना निवडून देणे गरजेचे आहे, असे अण्णासाहेब देशमुख यांनी सांगितले. तर मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत या माजी आमदाराने कधी तोंड उघडले नाही. आमच्याइकडे एक जादूगार आहे, त्याने जादू केली व दूध संघ विकला, अशा शब्दांत शिवाजीअण्णा भुईटे यांनी माजी आमदार राहुल मोटेंवर टीका केली. तर या माजी आमदाराला आपण तीन वेळा निवडून दिलं, तसं आता तीन वेळा पाडायचं आहे, असे सांगून ‘ताई तू एक तरी बचत गटाला कधी मदत केली आहे का? केली असेल तर माझ्या नवर्याची एका महिन्याची पगार बक्षीस म्हणून देते’, असे अर्चनाताई दराडे यांनी राहुल मोटे यांच्या पत्नीला ठणकावले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणुमंत गवळी यांनी केले होते.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजीअण्णा भोईटे, ज्येष्ठ शिवसेना नेते बबनदादा देशमुख, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, युवासेना तालुका प्रमुख नीलेश चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवीण जिल्हा परिषद सदस्य झानेश्वर गिते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, भूम दूध संघाचे माजी संचालक केशव चव्हाण, दूध संघ भूमचे माजी संचालक बाळासाहेब क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पवार, ईटचे माजी सरपंच दत्ता अहिरे, ईटच्या उपसरपंच प्रज्ञा देशपांडे, आंद्रूपच्या सरपंच वर्षा गिते, ईटचे माजी उपसरपंच शंभुराजे देशमुख, घाटपिंपरीचे मा. सरपंच रामराजे सातपुते, संजय गांधी योजनेचे सदस्य अप्पासाहेब भराटे, आदींसह महिला, पुरूष व युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.