राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचे प्रधानमंत्री मोदींना खुले पत्र

मुंबई – आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः मध्यपूर्व आशियात निर्माण झालेल्या अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भारतीय अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला सोन्याची खरेदी न करण्याचे आणि प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या अचानक केलेल्या घोषणेमुळे बाजारात आणि सर्वसामान्यांमध्ये काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याच अस्थिरतेच्या व चिंतेच्या वातावरणाची दखल घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधानांना एक सविस्तर खुले पत्र लिहिले असून, परिस्थिती हाताळण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
अचानक आलेल्या या आवाहनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, विविध उद्योग-व्यवसाय आणि मोठ्या गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता पसरली आहे. ही बाब देशाच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच काळजी वाढवणारी असल्याचे शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. अशा नाजूक वळणावर केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता दाखवत व्यापक सल्लामसलत करण्यावर भर देणे गरजेचे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एका तातडीच्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे, अशी प्रमुख मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि हिताच्या अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांवर निर्णय घेताना सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन एकत्रित निर्णय प्रक्रिया राबवणे हे सध्याच्या घडीला देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. केवळ राजकीय स्तरावरच नव्हे, तर देशातील नामांकित अर्थतज्ज्ञ, औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ मंडळींचीही तातडीने एक विशेष बैठक बोलावण्यात यावी. या बैठकीतून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सद्यस्थितीचा अत्यंत सखोल आढावा घेण्यात यावा आणि देशाच्या पुढील धोरणांबाबत सर्वांशी व्यापक विचारविनिमय व्हावा, असा मोलाचा सल्लाही देण्यात आला आहे.
सध्याच्या या आंतरराष्ट्रीय गोंधळाच्या आणि युद्धजन्य परिस्थितीत देशातील जनतेच्या मनात सरकारबद्दल विश्वास आणि देशात स्थैर्य निर्माण करणे, हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी या खुल्या पत्राद्वारे मांडली आहे.


