महाराष्ट्र

महामानवांची जयंती आणि सामाजिक भान !

 

 विश्वरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही भारत देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. हजारो जयंती मंडळ ही जयंती साजरी करण्यासाठी सरसावलेले असतात. वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची प्रत्येकाला ओढ लागलेली असते. विविध सांस्कृतिक , सामाजिक , समाज उपयोगी , प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाकडून केली जाते .मोठमोठ्या मिरवणुका ,तरुणाईचा जल्लोष यामुळे वातावरण एकूण भारावून गेलेले असते. सध्या डॉक्टर आंबेडकर जयंतीचे स्वरूप बदलले आहे. एक वेळ अशी होती की साध्या पद्धतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली जात होती .आता हाय फाय मिरवणूका निघत आहेत. काळ बदलला आणि डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात ही बदल झाला आहे. लाखो रुपयांची उधळण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी करताना सामाजिक भान असणे गरजेचे आहे असे वाटते .कारण ग्रामीण भागात व शहरी भागातील अनेक वस्त्यांमध्ये आंबेडकरी समाजाची अवस्था बिकटच आहे असे प्रकर्षाने जाणवते. सामाजिक दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. लाखो रुपये हे मिरवणुकीवर खर्च न करता समाजातील वंचित ,शोषित , गरिबांना मदतीचा हात दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याचे समाधान मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्य काळात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले .शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणाले आज हे शिक्षण महाग झाले आहे. आपल्या समाजातील मुला-मुलींना शिक्षण मिळते का याचा विचार झाला पाहिजे. शिक्षणामुळे पिढी घडते आणि समाज ताठ मानेने उभा राहतो. पण समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणाऱ्याना जयंती उत्सव मंडळांनी अशा मुलांना दत्तक घेऊन शिक्षणाची सोय केल्यास खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचे केल्यासारखे वाटेल. जे का रंजले गांजले , त्याशी म्हणे जो आपुले , तोचि साधू ओळखावा , देव तेथेची जाणावा या संत उक्ती प्रमाणे आपणास काम करावे लागणार आहे. सामाजिक भान आणि आजची सध्याची भयाण परिस्थिती लक्षात घेऊन आंबेडकरी समाजाला मार्गक्रमण करावे लागणार आहे. काही विद्वान लोकांना हे पटणार नाही पण सध्याची देशातील आणि राज्यातील परिस्थिती ही चिंताजनक आहे हे विसरून चालणार नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे काम आपल्या हातून होत आहे का याचा मागोवा घेण्याचे काम चळवळीतील प्रत्येकाने करायला हवे .जातीवादाचे , विषमतेचे चटके सोसणाऱ्या समाजाला एकत्र आणून त्यांच्यामध्ये सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक परिवर्तन करण्याची तयारी आंबेडकरी नेतेमंडळी तसेच समाजातील विचारवंत मंडळी करतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंती उत्सवात जास्तीत जास्त विधायक काम करून जयंती उत्सव मंडळांनी एक आदर्श निर्माण केला तर भावी पिढीला यातून काहीतरी घेण्यासारखे ठरेल. सामाजिक भान , सामाजिक प्रगती , शैक्षणिक मदत , समाज उपयोगी उपक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम याद्वारे विश्वरत्न डॉ. आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या बहुजन समाजाने मार्गक्रमण केल्यास सामाजिक परिवर्तनास गती मिळाल्याशिवाय राहणार नाही.
स्वामीराव गायकवाड
मो- 7385366330

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button