महिला कॉन्स्टेबलच्या साक्षीमुळे ९ पोलिसांना फाशी

सथानकुलम – कोविडच्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना तमिळनाडूतील सथानकुलम येथे एका घटनेने सर्वांना हादरवून सोडले होते. पोलीस कोठडीत बाप आणि लेकाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा अत्यंत वेदनादायक अंत झाला. या खळबळजनक प्रकरणात आता मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मोठा निकाल दिला असून, दोषी ठरलेल्या ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्यात एका महिला हेड कॉन्स्टेबल एस. रेवती यांची धाडसी साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने या घटनेला ‘अतिशय दुर्मिळ गुन्हा’ असे नमूद करत, पीडित कुटुंबाला १.४ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
ही संपूर्ण घटना २०२० मधील कोविड लॉकडाऊनच्या काळातील आहे. १९ जून २०२० रोजी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून मोबाईलचे दुकान जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपावरून पी. जयराज (वय ५८ वर्षे) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (वय ३१ वर्षे) यांना सथानकुलम पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पोलीस ठाण्यात त्यांना रात्रभर भयंकर यातना देण्यात आल्या. साक्षीदार एस. रेवती यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, त्या रात्री साडे आठ वाजता त्या ड्युटीवर आल्यावर त्यांना एका खोलीतून वेदनेने विव्हळण्याचा आवाज आला. तिथे काही पोलीस कर्मचारी या बाप-लेकाला काठ्यांनी आणि बुटांनी बेदम मारहाण करत होते. त्यांच्या गुप्तांगांवरही आघात करण्यात आले. मारहाण करणारे पोलीस मध्येच दारू पिऊन पुन्हा दुप्पट क्रूरतेने त्यांना मारत होते. या अमानुष कृत्यामुळे ते दोघे रक्तबंबाळ झाले असतानाही, त्यांना त्यांच्याच रक्ताने माखलेली फरशी पुसायला लावण्यात आली. रेवती यांनी त्यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला असता, तोही उधळून लावला गेला आणि त्यांना नग्नावस्थेत बांधून ठेवण्यात आले.
या भयंकर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या बेनिक्स यांनी २२ जून रोजी, तर वडील जयराज यांनी २३ जून रोजी अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार या दोघांचा मृत्यू अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर एस. रेवती यांच्यावर पोलीस खात्यातून आणि बाहेरून प्रचंड दबाव व धमक्या आल्या, परंतु त्यांनी न घाबरता न्यायालयासमोर सत्य मांडले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी केला, त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाने तो सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने न्यायालयात सविस्तर आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण १० पोलिसांना दोषी ठरवण्यात आले होते, त्यातील एकाचा कोविडमुळे मृत्यू झाला, तर उर्वरित ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.



