भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजित नवले यांचा खळबळजनक दावा

बीड- नाशिक येथील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या धक्कादायक कृत्यांमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या या बाबाच्या प्रकरणात आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी एक अत्यंत गंभीर आणि मोठा दावा केला आहे. दोष निवारणाच्या नावाखाली आणि विशिष्ट पुजेचा भाग म्हणून राज्यातील तब्बल ३९ नेते तसेच लोकप्रतिनिधींनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःची करंगळी आणि अनामिका कापून घेतल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या ज्वलंत प्रश्नावर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच एक मोठा धडक मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित नवले यांनी राज्यातील या वादग्रस्त प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडली. नवनवीन पूजा आणि विधी सांगून राजकीय नेते, दिग्गज मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी, नामांकित पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि निष्णात वकील यांना अशोक खरात याने भुरळ पाडली होती. यापूर्वी राजकारणातील महत्त्वाची नावे असणारे सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांनीही सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर या बाबाच्या सांगण्यावरून स्वतःला इजा करून घेतल्याची चर्चा संपूर्ण राज्यात गाजली होती. नेहमी पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमानाने उल्लेख करणारे हेच नेते अशा भयानक अंधश्रद्धेला कसे बळी पडतात, असा संतप्त सवाल या निमित्ताने नवले यांनी उपस्थित केला आहे.
संविधानाची आणि मंत्रीपदाची शपथ घेताना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे वचन देणाऱ्या या नेत्यांनी स्वतःच आपल्या शपथेचा घोर अवमान केला आहे. त्यामुळे अशा अंधश्रद्ध लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी अत्यंत आक्रमक मागणी अजित नवले यांनी केली आहे. अनेक नेतेमंडळींचे अशोक खरात याच्याशी नेहमीचेच उठबस आणि अत्यंत जवळचे संबंध होते, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या गंभीर प्रकरणात जर लोकप्रतिनिधींवर योग्य ती कारवाई झाली नाही, तर राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या ६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. हायप्रोफाईल लोकांशी असलेल्या या बाबाच्या कनेक्शनमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.



