शैक्षणिक
कल्याणशेट्टी कुटुंबीयांवर जनतेचा विश्वास म्हणूनच मिळाले निवडणुकीत यश -मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आयोजित केलेल्या भव्य सत्कार कार्यक्रमात प्रतिपादन
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार सौ शांभवी कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी व सागर कल्याणशेट्टी यांनी निवडणुकीत नेतृत्व कौशल्य आणि कर्तुत्वाच्या जोरावर विजय संपादन केला आहे. कल्याणशेट्टी कुटुंबीयांनी शहर व ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट घेतले म्हणूनच निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरीजामाता प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय तसेच मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या कल्याणशेट्टी कुटुंबातील सदस्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या नुतन सदस्या सौ शांभवी कल्याणशेट्टी, अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री मिलन कल्याणशेट्टी व अक्कलकोट पंचायत समितीचे नुतन उपसभापती श्री सागर कल्याणशेट्टी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, जूनियर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश आवटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक दंतकाळे, बापूजी निंबाळकर, शिवानंद पुजारी, दिगंबर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्कार हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो समाजाच्या मूल्यांचा सन्मान आहे. सत्कारामुळे समाजात चांगल्या विचारांची आणि कार्याची परंपरा निर्माण होते आणि समाज अधिक सक्षम व प्रगत बनतो. म्हणून संस्थेने हा सत्कार केला आहे.
यावेळी निशिगंधा सोमेश्वर, दिगंबर जगताप, बापूजी निंबाळकर, डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे, जि प सदस्या शांभवीताई कल्याणशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिगंधा सोमेश्वर यांनी केले सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले आभार प्रा गुरुशांत हपाळे यांनी मानले.




