शैक्षणिक
शिक्षण सेवेतून निवृत्ती ही शिक्षकांच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात – आमदार सचिन कल्याणशेट्टी

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात गौरव उद्गार
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
शिक्षकांची शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती ही त्यांच्या जीवनातील नवीन पर्वाचा प्रारंभ असतो. त्यांचे ज्ञान, अनुभव आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम कधीही निवृत्त होत नाही. म्हणून शिक्षकांनी सेवानिवृत्ती नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली पाहिजे, समाजाला आपल्या अनुभवाचा लाभ देऊन सन्मान मिळवला पाहिजे असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालय अक्कलकोट व अनंत चैतन्य विद्यालय हन्नूर येथील मुख्याध्यापक अशोक साखरे, सरदार मतेखाने पर्यवेक्षक सुरेश रूगे, श्रीमती श्रीदेवी मायनाळे, सेवक विश्वनाथ सैदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलामध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, उपाध्यक्ष भीमराव साठे,माजी मुख्याध्यापक सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संचालिका तथा जि प सदस्या शांभवी कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, जूनियर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, किणी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अशोक रामशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवेमुळे संस्थेची शैक्षणिक प्रगती होते. संस्थेच्या वाटचालीत सुरुवातीला आलेल्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि समर्पणाने घालून दिलेला आदर्श पुढील पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी असते, म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांनी नवीन पर्वाची सुरुवात करत असताना समाजाचे व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक झाले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले, सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार मनीषा दूधभाते यांनी मानले.
या कार्यक्रमास हन्नूर प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे, माजी मुख्याध्यापक विलास बिराजदार, गुरूनाथ गवंडी, पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील, भैय्या मुल्ला उपस्थित होते.
चौकट –
स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करावे
सेवानिवृत्तीनंतर शिक्षक हा शिक्षण क्षेत्राशी जोडलेला असतो, म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केले पाहिजे. वाचन संस्कृती, सामाजिक उपक्रम, व्याख्याने व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले.




