आदरणीय सुराणा सर आणि बाबा आढाव जातात तेव्हा…

आपण जगतो ते जगण किती जणांच्या वाट्याला आलं याचा विचार करून दाटलेल्या भावना या काय असतात? मला दोन वेळेच जेवण मिळून मी कोणत्याच संघर्षाशिवाय रोजच जीवन जगतोय हे काय सांगत असतं? व्यवस्थेच्या चौकटीत किती जणांचा समान निभाव लागतो? अशा असंख्य प्रश्नांनी घेराव घातल्यानंतरच मनात दुसऱ्यांचं दु:ख घोळायला लागत. त्याच्याही वाट्याला मुक्तपणाचं जगण यावं आणि त्यानेही माझ्यासारखं समान चौकटीत वावरावं असं वाटायला लागतं. या भावनेने स्वत:च्या वाट्याला आलेलं समाधानाचं आणि विनासंघर्षाचं जगण झिडकारून कामगारांसाठी आयुष्य वेचलेले आदरणीय पन्नालाल सुराणा आणि डॉ. बाबा आढाव दोघेहे याच आठवड्यात गेले.
आजच्या भौतीक साधनांच्या जगात साधेपणाचं वृत घ्यायचं आणि ते पाळायचं हे एक तपस्सेसारख आहे. चार कामांची बेरीज नसली तरी गाड्यांचा ताफा आणि नेतेगिरी फोफावलेली असताना आपली एसटी आणि प्रवास हे एक समीकरण सुराणा सरांचं होतं. सामान्य लोक जसे जगतात, फिरतात, राहतात तसा मी राहीन हा त्यांचा जीवनमंत्र होता. आपल्या गरजा कमी असतील तर माणूस भ्रष्ट होण्याच्या संधी कमी असतात असं ते म्हणायचे. लाल परी एसटी, पोस्टाचा लाल डबा आणि समाजवादी पार्टीचा लाल झेंडा यावर अपार निष् असेलेल हा सामजावादी विचारांचा खांब होता.
कायम देशभरातल्या कार्यकर्त्यांना पोस्ट कार्ड पाठवायचे. विविध विषयांवर तासनतास बोलत राहायचं, चांगल्या मार्गाने चांगले काम कसे करायचे, समाजवाद म्हणजे काय हे नेमक आणि सोप्या भाषेत सांगतं राहायचं. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषा त्यांना प्रभावी बोलता येत असत. लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अनेक विषयांवर ते कार्यकर्त्यांचा वैचारिक दृष्टिकोन विकसित करत होती. आज त्यांच्यासारखा विचारांवर अडळ श्रद्धा असणारा, वैचारिक अधिष्ठाण असलेला माणूस जातो तेव्हा फक्त सत्ता आणि सत्ता असा काळ अधिक गडद दिसायला लागतो.
बाबा आढाव यांच्या नाना पेठेतील त्या घरात विठ्ठल- भक्ती होती, पण त्याचबरोबर विद्रोही तुकारामांच्या समतेचे आणि संघर्षाचे बीजही होते. हायस्कूलमध्ये असतानाच बाबांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. १९४३ ते १९५० या काळात ते नियमितपणे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात. त्याच वेळी एस. एम. जोशी, भाऊसाहेब रानडे, ना. ग. गोरे, राममनोहर लोहिया या समाजवादी नेत्यांच्या सहवासातून त्यांच्या विचारांना ठोस सामाजिक-राजकीय चौकट मिळाली. पुढे भाई वैद्या, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते आदी सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी ही समाजवादी आणि सत्यशोधक विचारांची वाटचाल केली.
बाबांमुळे रिक्षा पंचायतीसह असंघटित कामगार संघटना, कचरावेचक कामगार संघटना, पथारी संघटना, हमाल पंचायत, कागद काचवेचक संघटना, दिव्यांग संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, मोलकरीण संघटना अशा विविध संघटना उभ्या राहिल्या. बाबांच्या लढ्यामुळे अनेक कष्टकऱ्यांना न्याय मिळाला. लाढण्याचं मोठ बळ असल्याने बाबांना शासन पातळीवर मिळणारा सन्मान आणि दबदबा मोठा होता. उपेक्षितांच्या जगणाच्या भाग होऊन आयुष्यभर कामगारांचे प्रश्न मांडणारे आदरणीय सुराणा सर आणि बाबा आढाव यांच्यासराखी माणसं गेल्यावर घडवलेले अनेक कार्यकर्ते असले तरी जो खड्डा निर्माण होतो तो खूप खोल वाटतो.
-गणेश पोकळे



