तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका , अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

मुंबई – राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे आता धाबे दणाणले आहेत. कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. कामाचा पदभार स्वीकारताच त्यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. संपूर्ण राज्यभरात विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत ३३ आरोपींना अटक करून चक्क २७ आस्थापनांना सील ठोकण्याची मोठी कारवाई झाली आहे.
ही विशेष कारवाई २५ ते २८ मे या कालावधीत राबवण्यात आली. याअंतर्गत प्रतिबंधित गुटखा विक्रेते, भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. बृहन्मुंबई कोकण पुणे नाशिक अमरावती नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख विभागांमध्ये ही तपासणी राबवली गेली. राज्यभरातील ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून ३४ ठिकाणी गंभीर नियमभंग समोर आले. यानंतर पोलिसांत २५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरलेली पाच वाहने जप्त करून तब्बल २०.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल अधिकाऱ्यांनी हस्तगत केला. यात बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई पाहायला मिळाली, जिथे १९ आस्थापना सील करून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
या मोहिमेत फक्त गुटख्यावर लक्ष न केंद्रित करता दैनंदिन वापराच्या वस्तूंची कसून चौकशी करण्यात आली. यात पॅकबंद पिण्याचे पाणी दूध नूडल्स खाद्यतेल फरसाण आईस्क्रीम मसाले खवा पनीर तूप बेसन आणि बेकरी पदार्थांची गुणवत्ता तपासण्यात आली. या कारवाईत एकूण २८.७८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संशयास्पद पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
राज्यात वेगवेगळ्या भागांत धक्कादायक प्रकार समोर आले. जळगावमध्ये गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध बनवण्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यात आरोग्याला घातक ठरणारे इथिलीन रसायन वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले. धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन बनवले जात होते. धारावीत लेबलिंगचे नियम धाब्यावर बसवून नूडल्सचे उत्पादन सुरू होते. नाशिकमध्ये कोणत्याही परवान्याशिवाय आणि बनावट लेबल लावून वस्तू बनवणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकण्यात आली. तर पालघरमध्ये अस्वच्छ परिस्थितीत तयार केल्या जाणाऱ्या आईस्क्रीम कारखान्यावर कारवाई करत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सुरक्षित अन्नाविरोधातील ही मोहीम सातत्यपूर्ण राहील असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ग्राहकांना तक्रारी त्वरित नोंदवता याव्यात यासाठी प्रशासनातर्फे एक नवीन मोबाईल अॅप आणि टोल-फ्री क्रमांक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.



