सोलापूर

गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर पाठिंबा

 

सोलापूर ( प्रतिनिधी )

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिले मिळावीत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर पाठिंबा देत सरकार आणि साखर कारखाना व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या न्याय्य हक्कासाठी संसद ते रस्त्यावर संघर्ष करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी गेल्या सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. शेतकरी हा देशाचा कणा असून मायबाप शेतकरी आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र सरकारला या प्रश्नाचे कोणतेही गांभीर्य नाही. याचा मी तीव्र निषेध करते.

मी येथे केवळ भाषण देण्यासाठी आलेली नाही, तर शेतकऱ्यांना खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आले आहे. नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत बिल मिळाले पाहिजे. केंद्र सरकारनेही त्याबाबत नियम केले पाहिजेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेत ऊस बिले अदा करणे बंधनकारक आहे. याच संदर्भात मी हा विषय संसदेतही मांडला आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना म्हणाले हे निगरगट्ट सरकार असून शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेले सरकारच आज शेतकऱ्यांकडे पाठ फिरविण्याचे पाप करत आहे. शासन आणि कारखानदारांच्या मिलीभगतीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. वरपासून खालपर्यंत शेतकऱ्यांना न्याय नाकारण्याचे काम सुरू आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची खंत व्यक्त करत खासदार शिंदे म्हणाल्या की, ऊस बिलासाठी शेतकरी मायबाप आज रस्त्यावर उतरला आहे. एका बाजूला खतांच्या किमती वाढल्या आहेत, डिझेलचा तुटवडा आहे, सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत अनिश्चितता आहे, पीक विमा मिळत नाही आणि त्यातच ऊस बिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

शेतकऱ्यांच्या मतांमुळे मी निवडून आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. तुमची ही लढाई मी लढणार असून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेन. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी गल्ली ते दिल्ली आवाज उठविणार आहोत, असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button