राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
मुंबई : -यंदाच्या मोसमात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीचा फटका मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक बसल्यामुळे सरकारकडे मदतीसाठी मागणी केली जात आहे.त्यातच राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणी पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत केली जात असून*,
जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जात आहे.
राज्य सरकारने ही मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर त्यांना उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आतापर्यंत पावसामुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळेच फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.
अवघ्या ८ दिवसांच्या आत ही मदत संबंधित पीडितांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.सरकारी निकषांनुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख तसेच दुधाळ जनावर दगावल्यास ३७ हजार ५०० रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.याशिवाय शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर (वराह) दगावल्यासही प्रत्येकी ४ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.या प्रकरणी मोठ्या जनावरांची मर्यादा ३,तर छोट्या जनावरांची मर्यादा ३० इतकी ठेवण्यात आली आहे.



