सोलापूर जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
सोलापूर – दिनांक २७/०९/२०२५ आणि २८/०९/२०२५ रोजी रेड अलर्टमुळे अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित राहण्याबाबत नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सोलापूर जिल्ह्यासाठी २७ सप्टेंबर २०२५ आणि २८ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. याचा अर्थ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे*. या गंभीर हवामान परिस्थितीत आपल्या सर्वांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.
जिल्हा प्रशासन आपणास आवाहन करते की, आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी कृपया खालील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे: –
सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक सूचना:
घरातच थांबा: अति आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
प्रवासावर नियंत्रण : शक्य असल्यास प्रवास पूर्णपणे टाळा. नदी, नाले, ओढे किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवू नका किंवा पायी जाऊ नका.
पुरापासून सावध राहा : नदी, तलाव किंवा पूरप्रवण भागापासून दूर राहा. सेल्फी काढणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळा.
विजेच्या उपकरणांपासून दूर राहा: वीजपुरवठा खंडित झाल्यास, मेन स्विच बंद करा. विजेच्या तारा किंवा खांब तुटलेले दिसल्यास त्यांना स्पर्श करू नका आणि तात्काळ संबंधित विभागाला कळवा.
पशुधनाची काळजी घ्या: आपल्या पाळीव प्राण्यांना आणि जनावरांना सुरक्षित व उंच ठिकाणी ठेवा.
अफवांवर विश्वास ठेवू नका : अधिकृत सूत्रांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवा पसरवू नका.
आपत्कालीन संपर्क: कोणत्याही मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस/आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधा.



