सामाजिक

रमाईच्या त्याग आणि कष्टामुळेच भीमराव बाबासाहेब झाले!

 

प्रसिद्ध वक्ते सागर सोनकांबळे यांचे प्रतिपादन : पिंपरी येथे रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पिंपरी (प्रतिनिधी):-
तत्कालीन वर्णव्यवस्थेच्या शोषण काळात प्यायला साधे पाणी मिळत नव्हते. शाळेच्या वर्गात बसू दिले जात नव्हते. तरीही वर्गाबाहेर बसून भीमराव आंबेडकर नावाचा महामानव शिकला. विशेषतः घरची गरीबी असताना सुद्धा भीमराव परदेशात शिकले. या कठीण काळात त्यागमूर्ती माता रमाईने त्या गरिबीचे चटके भीमरावांना कधीच बसू दिले नाहीत. अगदी गोवऱ्या थापून, त्या विकून संसाराचा भार सांभाळला. गरिबीमुळे चार मुलांचा औषधाविना झालेला मृत्यू आदी संकटाची झळ रामजी सुभेदाराच्या भीमरावांना रमाईने बसू दिली नाही. रमाईने डॉ.बाबासाहेब होण्यास प्रचंड कष्ट सहन केले म्हणूनच भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा वक्ते व आंबेडकरी चळवळीच्या अभ्यासक सागर सोनकांबळे यांनी केले.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्याचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने बुद्ध वंदना व मानवंदना, व्याख्यान, भव्य मिरवणूक व बाईक रॅली, पुरस्कार वितरण, कवी संमेलन असे भरगच्च नियोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना वक्ते सोनकांबळे म्हणाले की, रमाबाई एक साधी आणि कर्तव्यदक्ष स्त्री होती. त्यांनी आपल्या पतीची आणि कुटुंबाची सेवा करण्याचा आपला धर्म मानला. कोणतीही आपत्ती असो, कोणाचीही मदत घेणे त्यांना कधीच पटले नाही. त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले होते. तेव्हा जवळच्या म्हणजे ओळखीच्या काही लोकांनी त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. पण, स्वाभिमानी बाण्याच्या रमाईने ती मदत घेण्यास नकार दिला. कारण, माता रमाई या समाधानाची, सहकार्याची आणि सहिष्णुतेच्या मुर्ती होत्या. आनंदाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच्या प्रयत्नातून रमाई थोडेफार वाचायला आणि लिहायला शिकल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेब नशिबवान होते की, त्यांना रमाई सारख्या त्यागमूर्ती सहचारिणी मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे रमाई केवळ बाबासाहेबांच्या सावली झाल्या नाहीत, तर समाजातील वंचित आणि उपेक्षितांची माऊली सुध्दा झाल्या होत्या. त्यांच संयमी वागणं आणि मायेचे बोलणे सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती देणारे होते.

महामानवाची सावली आणि रंगल्या-गांजल्याची माता असलेल्या माता रमाईने बाबासाहेबांच्या प्रत्येक संकटात आणि समतेच्या लढ्यात नेहमी खंबीरपणे मोलाची साथ दिली होती. त्यामुळे बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता, असे म्हटले तर ते कधीही वावगे ठरणार नाही. बाबासाहेबांच्या शिक्षणाला व त्यांच्या पुढील सामाजिक बदलाच्या संघर्षाला प्रोत्साहन देवून रमाईंनी एक आदर्श घालून दिला आहे. म्हणून सामाजिक सुधारणांसाठीच्या प्रयत्नांना कृतीशील पाठबळ देणाऱ्या रमाई म्हणजे त्याग आणि संयमाच्या प्रतीक आहेत, असेही अभ्यासक सांगतात. त्यामुळे त्यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही वक्ते सोनकांबळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या जयंती सोहळ्यात लक्ष्मण रोकडे, प्रतिमा साळवे, विजया नागटिळक आणि वैशाली गायकवाड यांनी एकपात्री प्रयोग करून सर्वांची मने जिंकली. तसेच सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या कवी संमेलनात विद्रोही कविता सादर करून कवींनी सर्वच महापुरुषांच्या कार्याचा जागर केला. शाहीर देवेंद्र गावंडे यांचा परिवर्तनाची वाट प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रमाने सांगता झाली.

यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, प्रसिद्ध कला दिग्दर्शक संतोष संखद, युवा वक्ते सागर सोनकांबळे, सारिका कांबळे, भीमशाहीर गोविंद गाडे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे,राम भंडारी,रवी कांबळे , संगीता भंडारी यांच्यासह सर्व सदस्य, नामांकित कवी, एकपात्री कलाकार आणि बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट क्रमांक -माता रमाईच्या त्यागाला जगात तोड नाही -माता रमाईने पदोपदी दुःख कष्ट सहन करून समाजासाठी जो त्याग केला. भीमरावांच्या पाठीशी सदैव सावली सारखी उभी राहून विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घडविले. त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. रमाईच्या असीम त्यागामुळे भीमराव ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर असा प्रवास यशस्वी झाला, असेही गौरवोद्गार वक्ते सागर सोनकांबळे यांनी काढले.

चौकट क्रमांक -तुझ्या त्यागाचा हिशोब तरी
आम्ही कसा आणि कुठे द्यावा? -जयंती सोहळ्याचे औचित्य साधून अनेक कवींनी महापुरुषांच्या जीवनकार्य नमूद केले. यावेळी सुप्रसिद्ध कवी दंगलकर नितीन चंदनशिवे यांनी रमाई ही कविता सादर करून सर्वांना भावूक केले. ‘रमाई तू आभाळभर पदर पसरून सांडत राहिलीस जमीन फाटेपर्यंत, म्हणूनच रमाई तो ज्ञानसूर्य झळकत राहिला कायम, तुझ्या त्यागाचा हिशोब तरी आम्ही कसा आणि कुठे द्यावा?, मुखपृष्ठावर जरी बाप दिसत असला, तरी संविधान म्हणजे तुझा आक्रोशच वाटतो मला, तू उगवत्या सूर्याला सलाम आणि मावळत्या सांजेला निरोप देताना, फक्त सावल्यांशी संसार बांधत राहिलीस’ असेही म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button