महाराष्ट्र

वारी परिवर्तनाची

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी होय. शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेली ही वारी महाराष्ट्राच्या चैतन्याचा खरा स्त्रोत आहे.संतांनी सुरू केलेल्या या वारीला आता भक्ती उत्सवाच स्वरूप आलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून लक्षावधी वारकरी या आनंदसोहळ्यात सामील होऊन पंढरीच्या वाटेने चालू लागतात.पंढरीचा विठोबा त्यांना अमाप उत्साह आणि ऊर्जा देतो. त्यामुळेच शेकडो मैल चालूनही या वारकऱ्यांना थकवा जाणवत नाही हे या वारीच वैशिष्ट्य आहे.
वारकरी संप्रदायाचा मुळ गाभा पंढरीचा विठ्ठल होय. पांडुरंगाच्या भक्तीप्रेमात वारकरी संतांची साहित्यनिर्मिती एकरुप झालेली आहे. विठ्ठल -विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी || या नामगजराने चंद्रभागेचा तीर दुमदुमून गेला. भौतिक जीवनातील संघर्ष टाळण्यासाठी आणि विश्वबंधुत्व अबाधित ठेवण्यासाठी वारकरी संप्रदाय नामचिंतनाच्या पायावर उभा आहे.सामाजिक जीवनातील गरजा भागविण्याचे व मूल्यनिष्ठ जीवनाचा आदर्श चिरंतन ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले. आजच्या विज्ञान युगातही संत साहित्याची सोबत प्रत्येक व्यक्तीला आधार देते.अव्दैताचे अतुट जागरण वारीच्या माध्यमातून वारकरी करीत आहेत.यातुनच सामाजिक परिवर्तन घडून येतं.
महाराष्ट्राच्या मनावर सात्विकतेचा,भावभक्तीचा,व निस्वार्थाचा प्रभावी संस्कार वारकरी संतांनी केला.देवाला भेटायला जाणे आणि देव आपल्यासाठी वाट पाहत उभा आहे,ही विलोभनीय स्थिती विश्वात कुठेही दिसणार नाही. आम्हा सापडले वर्म करु भागवत धर्म हेच ध्येय उराशी बाळगून संत ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, एकनाथ महाराज आदी संतांनी वारकरी संप्रदायाचे मुळतत्व समजावून सांगितले.वारीमधून मानवी जीवनाची जीवनमूल्ये जोपासली. अध्यात्म भक्ती व आचरणाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. वारकरी संप्रदायाने समाजाला नैतिक अधिष्ठान देवून निकोप समाजनिर्मीतीचा प्रयत्न केला. जीवनातील कर्मयोगालाच भक्तीयोगाचे स्थान प्राप्त करून देता येते हे अभंग, ओवीतुन प्रगट केले. उच्च -निचतेच्या भिंती तोडून स्त्री,शुद्र,अंत्यंज,जातीहिन आदि समजल्या जाणाऱ्यानाही भक्तीच्या पंक्तीत बसविण्याचे कार्य संतांनी केले. ज्ञान, भक्ती,कर्म या तिहींचा समन्वय साधून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अज्ञानापासून ते सज्ञानापर्यंत सर्वांना सुलभतेने भगवंतांची प्राप्ती करून देणारा साधनमार्ग म्हणजेच हा वारकरी होय.
आपापसातील भेद, उच्च नीचता न मानणारे वारकरी पंढरपूरात एकत्र येतात. एकत्रितपणे संत विचाराने वर्षभर वाटचाल करतात. या एकसंघामुळेच धर्म विचारातील संकुचीत वृत्ती काढून टाकून मानव धर्माची व्यापकता समाजात रुजवली. म्हणूनच वारी ही समाजपरिवर्तनाची संस्कारपीठ ठरली.

ह.भ.प. चंद्रकांत दत्तात्रय डांगे
तीर्थक्षेत्र अक्कलकोट
९६२३४१४२५१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button