महाराष्ट्र
मुंबईत मराठा समाज आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा

अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या विरोधात एकीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत.
उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. तर दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक होताना दिसत आहेत.
मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि आंदोलने करण्यात आली आहे. त्यांच्या काही मागण्यांना सरकारने मान्यता दिली असली तरी त्यांचं पुरेसं समाधान झालेलं नाही.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवली सराटीत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येत मराठा समाजाचे आंदोलक जमले होते.
या बैठकीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा केली. २७ ऑगस्टला निघायचं आणि न थांबता २ दिवसांत मुंबईत जायचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.