सामाजिक

विद्यार्थी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सागर सोनकांबळे ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित

विद्यार्थी चळवळीतील अभ्यासू नेतृत्वाचा गौरव :
किणीच्या सुपुत्राचा पुणे येथे राज्यस्तरीय सन्मान
 अक्कलकोट (प्रतिनिधी):-
अक्कलकोट तालुक्यातील मौजे.किणी गावचा सुपुत्र तथा विद्यार्थी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता सागर सोनकांबळे यांना पुणे शहरातील बालगंधर्व सभागृह येथे दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमहापौर परशुराम वाडेकर आणि प्रसिध्द कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते 
‘पॅंथरत्न’ या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढणाऱ्या युवा कार्यकर्त्याच्या कार्याचा झालेला हा सन्मान म्हणून या पुरस्काराकडे पाहिले पाहिजे, अशा शब्दांत दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी सागर सोनकांबळे यांच्या कार्याची दखल घेतली.   
सुप्रसिध्द वक्ते सागर सोनकांबळे यांनी गेल्या दशकभरात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश, शैक्षणिक कागदपत्रे, विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशासकीय स्तरावरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थी चळवळींमध्ये संघर्ष, सातत्य आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून सोनकांबळे यांच्याकडे पाहिले जाते. उच्चशिक्षित असलेल्या सोनकांबळे यांनी शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ निवेदने देण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका विशेष ठरते. अनेक लक्षवेधी आंदोलने, मोर्चे आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या चळवळींमुळे प्रशासनालाही विविध प्रश्नांची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थी चळवळीतील एक अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक प्रश्नांबाबत स्पष्ट भूमिका घेणे, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठविणे आणि संविधानिक मूल्यांच्या चौकटीत राहून संघर्ष करणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांना त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा आधारस्तंभ मानले आहे.
सामाजिक परिवर्तनाचा मार्ग हा वैचारिक प्रबोधन, संघटन आणि लोकशाही संघर्षातूनच जातो, या भूमिकेवर ते ठामपणे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या मर्यादा ओलांडून विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. विचारभिन्नता असली, तरी समाजहितासाठी संवाद आणि सहकार्य आवश्यक असल्याची त्यांची भूमिका अनेकांना प्रेरणादायी वाटते. संघटन कौशल्य, अभ्यासपूर्ण मांडणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. तरुणाईमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी ते विविध उपक्रमांमधून सक्रिय सहभाग नोंदवत असतात. पॅंथर रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button