महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ

 

रामदास स्वामी शिवरायांचे गुरु असल्याचा योगी आदित्यनाथांकडून अपप्रचार, जिरेटोप घालून महाराजांचा अपमान करणाऱ्या योगींनी माफी मागावी.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना भाजपा सरकारकडून सुरक्षा व पुरस्कार, सोलापूरकर, कुलकर्णी, कोरटकरची हिम्मत होतेच कशी?

मुंबई –
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही पण आता मात्र या प्रवृत्तींचा कडलोट करा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
गांधी भवन यथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, पुण्यातील शिवसृष्टीवर कुलकर्णी नावाच्या एका विकृताने लघुशंका केली. त्यावेळी त्याची पत्नी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. हा कुलकर्णी अफलज खानाचा वकील भास्कर कुलकर्णीची औलाद आहे. सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारे, तुकारामाची गाथा बुडवणारे, काळाराम मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्या ह्याच प्रवृत्ती आहेत आणि ते महाराष्ट्र नासवण्याचे काम करत आहेत. पण दुर्देवाने त्यांच्यावर काहीच कारवाई होतं नाही. भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? भाजपाच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिले जाते, सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागत सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते असा खोटा इतिहास योगी सांगत आहेत. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते पण जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. ह्याच योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा जिरेटोप घालून शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या जिरेटोपाला अनन्यसाधारण महत्व आहे पण भाजपाचे नेते सातत्याने जिरे टोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत, याआधी पंतप्रधान मोदी यांनीही जिरेटोप घातला होता. जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगींनी व मोदींनी जाहीर माफी मागावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ब्राह्मण समाजासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान एकांगी आहे. फक्त ब्राह्मण समाजच साखरेचे काम करत नाही तर समाजातील सर्व जाती महाराष्ट्र धर्मात अमृत ओतण्याचे काम करतात, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी योगदान दिलेले आहे. ही कोणत्या एका जातीची ठेकेदारी नाही तर अठरापगड जातींचे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, लाल बहाद्दुर शास्त्री, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांची जात सांगण्याची वेळ आली नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button