राजकीय
नव्याने आणि जोमाने तालुक्यात काँग्रेस पक्ष उभा करु – माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा

अक्कलकोट : ( प्रतिनिधी)
एखादी व्यक्ती पक्षातून गेली म्हणून पक्ष संपत नाही, आम्ही नव्याने आणि जोमाने तालुक्यात काँग्रेस पक्ष उभा करु असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी पत्रकार परिषदेत केले. काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा डॉ सुवर्ण
मलगोंडा , माजी जि. प. सभापती मल्लिकार्जून पाटील , अरुण जाधव आदीनी शनिवारी मल्लिकार्जून पाटील यांच्या एवन चौकातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. विधानसभेला काॅग्रेस पक्षाला सुमारे एक लाख मतदान झाले. ही काॅग्रसची ताकद विसरता येणार नाही स्वातंत्र्या नंतर आज पर्यंत ११वेळा काॅग्रेस पक्षाला यश मिळाले आहे.काॅग्रेस पक्षाने मला नगराध्यक्ष केले महिला जिल्हाध्यक्षा केले. माझी आई श्रीमती पार्वती मलगोंडा यांना मंत्रिपद दिले याची जाणीव आहे. राजकीय वारे फिरले म्हणून मी बदलणार नाही. काॅग्रेसला वार्यावर सोडणार नाही.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेसची घडी बसवणार असे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी सांगितले.
माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव म्हणाले, काॅग्रेसपक्षाने अनेक वादळे पचवली आहेत. लोक येतात जातात पक्ष संपत नाही संपणार नाही.मी पक्षातच राहणार आहे.सर्व प्रथम मी भूमिका जाहीर केली होती. माझ्या भूमिकेचे स्वागत खासदार प्रणिती शिंदे यांनी केले असे सांगितले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील म्हणाले आगामी काळात शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात येणार आहे . आता काॅग्रेस संकटात असली तरी भविष्यकाळ उज्ज्वल आहे.तीकडे गेलेले काँग्रेसजन आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्व जाती , धर्म , समाज घटकांनां घेऊन जाणारी आहे. काँग्रेस पक्ष विचारधारा ही आमच्या नसात आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. कोणी सोबत येवो अगर न येवो मी मात्र माझ्या परीने काँग्रेस पक्षाचे काम करत राहणार असे मल्लिकार्जून पाटील यांची सांगितले.
