
रखरखत्या उन्हात
बाप उभा राहिला.
आम्ही सावलीत आलो,
बाप सुर्यासारखा
तळपत राहिला अन,
आम्ही प्रकाशित झालो.
बाबांनी चवदार
तळ्याचा सत्याग्रह केला.
“अन आमची
तहान भागली.
आम्ही तृप्त झालो.
बाबा शिक्षण घेत
असताना,
अर्धउपाशी राहिला.
अन,
आता साऱ्या समाजाची
भूक भागली.
कोटी कोटी लेकरांच
भविष्य उज्वल करणारा
माझा बाप,
जणू तेजस्वी तारा.
खुल्या ओंजळीने
वाटलं आम्हाला,
अन आम्ही धनवान झालो.
आम्ही होतोच
हजारो वर्षे,
गुलामगिरीच्या जाळ्यात
अन्यायाचे चटके सोसत
कसबस अर्थ
नसलेलं आयुष्य जगत.
बाबा आले स्वाभिमान दिला,
अन,
आम्ही माणसात आलो.
बाबांनी,
गावकुसाबाहेरचा संपूर्ण
समाज गावात आणला.
“कित्येक वर्षे
अंधारलेल्या झोपडीत
होतो.
बा भीमा तू आलास
आणि,
आम्ही इमारतीत आलो.
माझ्या आधीची पिढी
माझी पिढी,
अन येणाऱ्या
हजारो पिढ्यांना
पुरेल इतकी,
ज्ञानसंपदा धनसंपदा
बहाल केलीस बा भीमा.
बा भीमा तू
होतास म्हणून
या जगण्याला अर्थ आला.
तुझा जन्म
आमचा श्वास झाला.
तू बुद्ध दिलास
अन आम्ही,
विज्ञानवादी झालो.
तुझंच आहे सगळं.
तू काळजात आहेस.
काळाच्या पुढे
जाऊन आमच्या
जिंदगीच सोन करणारा
आमचा सर्वांचा
तू बाप आहेस…
-प्रविण…..




