महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी

मुंबई : राज्यात विधानसभेसाठी तिस-या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा होणार आहेत. उद्या हे प्रमुख नेते एकत्रित दौरा करणार आहेत. त्यांचा नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पाहणी दौरा होणार आहे. त्यामुळे राज्यात तिस- या आघाडीचे संकेत मिळाले आहेत.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील युती किंवा आघाडीसोबत जाण्याची चाचपणी सुरु केली आहेत. त्यातच राज्यात तिस-या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हा दौरा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड आणि परभणी दौ-यावर छत्रपती संभाजीराजे ( स्वराज्य पक्ष प्रमुख), बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख), राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना), डॉ. राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) आणि नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी) हे नेते असणार आहेत. यावेळी ते शेतक-यांची कैफियत ऐकून घेणार आहेत.