
सत्य बोलणे हाच देवलोक
असत्य बोलणे हाच मृत्यूलोक
आचारच स्वर्ग, अनाचारच असे नरक
सदैव करावी सज्जन संगती
नको नको संगती दुर्जनांची
असो सर्प कोणताही, विष त्याचे एक
म्हणूनिया देख, संग नको….
बसवण्णा विषयी काय लिहावे ? यापेक्षा बसवण्णा विषयी काय काय लिहावे ? हा प्रश्न मला पडला आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रस्थापित धर्माला, धर्म व्यवस्थेला फक्त विचारातून नाही. तर कृतीतून किती मोठे भगदाड पाडू शकते याचे उदाहरण म्हणजे १२ व्या शतकातील देशभर प्रभाव पाडणारे आधुनिक धर्माचे प्रणेते बसवेश्वर महाराज.
आज २१ व्या शतकात ज्यावेळी लोक कर्मकांडात आकंठ बुडाले आहेत. आणि गरज नसलेल्या रूढी परंपरा अस्मितेच्या नावावर पोसत आहेत त्याठिकाणी बसवण्णानी केलेले १२ व्या शतकातील कार्य हे खूप मोलाचे वाटते. १२ व्या शतकात ज्यावेळी खोट्या जातीय अभिमानाचे स्तोम माजलेले असताना बसवण्णाने कधीही उच्च नीच भेदभाव मानला नाही. आपल्या समोर एक अस्पृश्य मुलगा विहिरीत बुडत आहे. ही घटना घडताना आपण विटाळले जाऊ या विचाराने कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही हे पाहून बाल बसवण्णा स्वतः पाण्यात उडी मारून त्या मुलाला वाचवतात. या गोष्टीची तुलना महात्मा जोतिबा फुले किंवा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकाळाशी केली तर १२ व्या शतकात विटाळ या विषयाची दाहकता किती असू शकेल ? याची प्रचिती आपल्याला येईल. सोबतच बसवण्णा लहान असल्याने या गोष्टी अजाणतेपणी घडल्या असे वाटणे शक्य आहे. पण पुढील घटना ही त्यापेक्षा देखील मोठी आणि व्यवस्थेला धक्का देणारी आहे.
आज २१ व्या शकतात देखील खूप साऱ्या ठिकाणी मुलांच्या मुंज करण्याचे मोठं मोठे कार्यक्रम होतात जे आपण पाहतोच. तिथे वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मी मुंज करणार नाही. जर माझी मुंज करणार असाल तर ती आधी माझ्या आईची आणि माझ्या बहिणीची करा. हे व्रतबंध संस्कार एवढे चांगले असतील तर आधी त्यांचे करा मग माझे. असा विचार बसवण्णानी मांडला आणि फक्त त्यावर ते थांबले नाही तर मुंज करूनच घेतली नाही. या निर्णयावर ठाम राहत गृहत्याग करण्यासाठी देखील बसवण्णा तैयार झाले. त्यांचे वडील मादीराज हे आजूबाजूच्या गावामध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी जायचे त्यामुळे पंचक्रोशीत ते प्रसिद्ध. त्यांचा मुलगा बसवण्णा व्रत संस्काराच्या भर कार्यक्रमात सर्वांसमोर असे ठामपणे बोलतो, धर्मात नीतिमूल्ये आणून वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी व्रत संस्कार वर भर कार्यक्रमात स्त्री पुरुष समानतेचा न्यायनिवाडा करतो. ही गोष्ट साधी न्हवे. हे २१ व्या शतकात एवढ्या ठामपणे बोलणारे आपल्याला मिळतील का ? हा प्रश्न आहे.
मासिक पाळीविषयी बसवण्णाचे विचार १२ व्या शतकात देखील आधुनिक असेच होते. मासिक पाळी आल्यावर जर स्त्री अशुद्ध, अपवित्र होत असेल तर त्या अशुद्ध गोष्टीतून जन्म घेणारा मी कसा काय शुद्ध असेल ? एवढा साधा आणि सोपा तसेच लोकांना विचार करायला लावणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इथे अजूनही मासिक पाळी आली की महिलांना किचन मध्ये, धार्मिक स्थळांवर प्रवेश नसतो. इस्लाममध्ये किंवा मुस्लिमांमध्ये विचाराल तर मासिक पाळी असताना नमाज देखील पठण करू नका म्हणून सांगितले जाते. तिथे बसवण्णाचा हा विचार मनात क्रांतीची बीजे पेरणारा राहतो.
बसवण्णा फक्त एवढे विचार मांडून थांबत नाही. तर स्वतः एका अनुभव मंटपाची स्थापना करतात. यात होते काय ? या अनुभव मंटपा मध्ये जे स्त्री पुरुष म्हणजेच शरण-शरणी सामील व्हायचे त्यांच्यात मुक्त संवाद व्हायचा आणि त्या संवादातून जो निष्कर्ष निघायचा ती धर्माची मूल्ये समजली जायची. जगात धार्मिक मूल्य बनवताना लोकशाही मार्गाने झालेला असा हा बहुदा एकमेव संवाद असावा. विशेष म्हणजे महिलांनी धर्माची तत्वे मांडली, ती धर्माने स्वीकारली आणि त्यावर आचरण केले गेले असा मला माहिती असलेला बहुदा लिंगायत हा जगातील एकमेव धर्म असावा. बर, अनुभव मंटपात होणारा हा संवाद फक्त दोन चार लोकांमध्ये होत न्हवता बरका. तर शेकडो लोक यात सामील व्हायचे. आणि आप आपले विचार अनुभव मंटपामध्ये मांडत. यात सर्व जाती आणि धर्माचे लोक सामील झाले. जे अनुभव मंटपात येऊन नंतर लिंगायत झाले.
लोक मोठ्या प्रमाणात लिंगायत होऊ लागले. लिंगायत झाले म्हणजे त्यांच्या आधीच्या जाती नष्ट झाल्या ते फक्त माणूस म्हणून गणले जाऊ लागले. तिथे कोणीही उच्च जातीचा नाही कोणीही कनिष्ठ नाही. सगळे समान. या विचारांचा प्रभाव एवढा पडला की अनुभव मंटपात येणाऱ्या एका ब्राह्मण व्यक्तीने आपल्या मुलीचा हात चांभार असलेल्या एका मुलाच्या हातात दिला आणि लग्न लावून दिले. अनुभव मंटप फक्त विचारात नको तर कृतीतून हवा यासाठी या गोष्टी केल्या. विचार करा १२ व्या शतकात ही क्रांती विचारांच्या जोरावर घडली. यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्था हादरू लागली. आणि सनातन्यांच्या पोटात दुखू लागले. याचे फळ म्हणून त्या काळच्या सनातन्यांनी तिथल्या सत्ताधारी राजाला सांगून दोघांचे डोळे काढले आणि हत्तीने सर्वांसमोर फरफटून त्यांना देहदंडाची शिक्षा दिली. ही शिक्षा पाहून पुन्हा कोणी असे करण्यास धजू नये हा त्यामागील उद्देश होता. या सत्य घटनांवर आधारित सिनेमा बनवून तो भारतभर प्रदर्शित होईल का ? हा ही प्रश्न मनात वारंवार येतो. असो, पण बसवण्णा चा अनुभव मंटप हे सर्व पाहून शांत राहिला नाही. तो पुढे अजूनच वाढतच गेला.
मला बसवण्णाचा एक युनिक पॉईंट सर्वात जास्त आवडला ते म्हणजे त्यांनी नाकारलेली समूह पूजा आणि स्वीकारलेली वैयक्तिक पूजा. समूह पूजा म्हणजे मोठ्या प्रमाणात जमा होऊन केली जाणारी देवाची भक्ती, सामुहिक नमाज पठण वगैरे. ज्या मंदिरात सर्व जातींना प्रवेश नाही त्या मंदिरांवरचा बसवण्णानी बहिष्कार टाकला. एवढेच नाही तर मंदिरात जाणे अजिबात गरजेचे नाही, यात्रा, मेळावे या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. असा विचार त्यांनी मांडला आणि त्याला पर्याय दिला तो म्हणजे इष्टलिंगाची पूजा करण्याचा. हे इष्टलिंग तुम्ही गळ्यात घालू शकता. आणि पाहिजे त्यावेळी पाहिजे तिथे त्याची पूजा करू शकता. यासाठी मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. बसवण्णा एक ईश्वर वादी होते. पण बसवण्णानी सांगितलेला ईश्वर हा इतर सर्वांपेक्षा वेगळा होता. हा ईश्वर सांगताना ते स्वर्ग नर्क नाकारतात. हा ईश्वर ग्रंथ प्रामाण्यवादी नाही. हा ईश्वर अनुभव मंटपातील सर्वच जाती धर्माच्या लोकांनी मांडलेले तत्वज्ञान मान्य करतो आणि केलेही तसेच त्याला धार्मिक मान्यताही देतो. हा ईश्वर धार्मिक तत्वज्ञान एका व्यक्ती किंवा व्यक्ती समूहा पुरते मर्यादित ठेवत नाही. एवढ्या उदार मनाचा ईश्वर बसवण्णानी मांडला. ती परंपरा अखंडितपणे त्यांच्या शरण शरणींनी सुरू ठेवली का ? हा देखील प्रश्न या काळात आपल्याला पडायला हवा. असो…
बसवण्णा या सर्व गोष्टी करत असताना. मी देवदूत आहे असे म्हणाले नाहीत किंवा मी देव आहे असेही म्हणाले नाहीत. किंवा मला देवाने पाठवले आहे असेही म्हणाले नाही. या सर्व गोष्टी बसवण्णानी ते एक मनुष्य आहेत असे सांगून केल्या. लोकांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत करून ज्या लोकांना कधीही साधे तत्वज्ञानाचा त देखील सांगता आला नसता अशा अगणित लोकांना देखील धर्माची वचने लिहिण्याचे सामर्थ्य देण्याची क्रांती बसवण्णानी केली. १२ व्या शतकात जगाच्या पाठीवर घडलेली ही साधी घटना न्हवे. त्यासाठी बसवण्णा हे कायमच महान व्यक्तींच्या यादीत गणले जातील. आज त्यांची जयंती यानिमित्ताने या महान आत्म्यास कोटी कोटी प्रणाम…
बसवण्णा हे प्रत्येक सुधारणावादी व्यक्तीचे रोल मॉडेल राहतील. निदान माझ्या सारख्या तर नक्कीच.
– पैगंबर शेख
पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५



