राजकीय

राजकारणातील ‘धैर्याचा’ महामंत्र

 

राजकारणात सत्तेची खुर्ची प्रत्येकालाच आकर्षित करीत असते. पण, ती खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही निवडलेला मार्ग तुमचा इतिहास आणि भविष्य ठरवत असतो. समाज माध्यमांवर अपप्रसारीत होणाऱ्या एकाच चौकटीतील दोन वेगवेगळ्या कालखंडातील छायाचित्रांनी आज भारतीय राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या अशा तत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे — ते तत्त्व म्हणजे, ‘धैर्य आणि निष्ठा’.

सदर दोन छायाचित्रांची कहाणी केवळ सत्तेची नाही तर, ती महत्त्वाकांक्षा विरुद्ध संयम अशा संघर्षाची आहे.

 पहिला अंक:
मध्यप्रदेश राज्य – घाई नडली; ओळख हरवली.
छायाचित्राच्या वरील पहिल्या भागात #राहुल_गांधी‌ यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे आणि, कमलनाथ दिसत आहेत. जेव्हा, मध्यप्रदेश राज्यात १५ वर्षांच्या वनवासानंतर काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केले तेव्हा, राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदेंना समजावताना म्हटले होते: “सिंधिया जी, तुम्ही तरुण आहात; पुढे खूप संधी येतील. आणि, पुढील मुख्यमंत्री तुम्हीच असाल. कमलनाथजींकडे आता ना जास्त वेळ आहे; ना वय आहे.”

पण, ज्योतिरादित्य शिंदेंना तो संयम राखता आला नाही. सत्तेच्या घाईत आणि, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी १५ वर्षांनी आलेले स्वतःच्याच पक्षाचे सरकार पाडले. भाजपमध्ये जाऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद नक्कीच मिळाले. पण, जे स्थान आणि स्वाभिमान एका स्वतंत्र लोकनेत्याचा असतो तो कुठेतरी हरवला. सध्या ते सत्तेत आहेत. पण, भाजपच्या दिल्ली दरबारातील एका मोठ्या गर्दीचा केवळ हिस्सा बनून राहिले आहेत. इतिहास साक्षी आहे; भाजप त्यांना कधीही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद बहाल करणार नाही.

 दुसरा अंक:
कर्नाटक राज्य – ‘संकटसमयी’ न डगमगलेला ‘ट्रबलशूटर’…
याउलट एक कहाणी आहे छायाचित्रातील खालच्या भागाची; जिथे राहुल गांधी यांच्यासोबत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हसताना दिसत आहेत. अशीच काहीशी स्थिती कर्नाटक राज्यातही निर्माण झाली होती. ज्येष्ठ विरुद्ध, तरुण असा संघर्ष तिथेही होता. पण, डी. के. शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींच्या शब्दावर विश्वास ठेवला.

त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचे दबाव आले; तुरुंगवास सोसावा लागला. पण, वाईट काळातही ते पक्षासोबत ढाल बनून उभे राहिले. त्यांनी पक्षाशी आणि, विचारसरणीशी कधीच गद्दारी केली नाही. आज त्यांच्या याच अढळ निष्ठेचे आणि, धैर्याचे फळ त्यांना मिळत आहे. ते कर्नाटकच्या राजकारणात केवळ किंगमेकर ठरले नाहीत तर, आता सन्मानाने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आलेले आहेत.

 संपादकीय निष्कर्ष:
राजकारणात ‘राजा’ कोण?
राजकारणामध्ये प्रत्येक चमकणारी खुर्ची ही तुमची अंतिम मंजिल असू शकत नाही. काही लोक खूप घाईघाईने स्वतःला ‘राजा’ घोषित करण्यासाठी निघतात आणि, तात्पुरती #सत्ता मिळवतातही; पण, हळूहळू ते दुसऱ्याच्या दरबारातील केवळ एक चेहरा बनून कुठेतरी कायमचे हरवून जातात.
याउलट जे लोक वादळातही पाय घट्ट रोवून उभे राहतात आणि, संकटकाळात पक्षाची पाठराखण करतात; काळ बदलला की, इतिहास त्यांच्याच गळ्यात यशाची माळ घालत असतो. ज्योतिरादित्य_शिंदे आणि, डी.के. शिवकुमार ही दोन उदाहरणे आगामी पिढीतील राजकारण्यांसाठी ‘काय करावे’ आणि, ‘काय करू नये’ याचा एक सर्वांत मोठा वस्तुपाठ आहेत.

 

 लेखन आणि, विश्लेषण:
श्री.प्रशांत दौंडकर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button