महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मुंबई – दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. आज आपण महाराष्ट्राचा 66 वा स्थापना दिन साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी भाषिक राज्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सध्याचे महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्रितपणे बॉम्बे स्टेटचा भाग होते. मात्र भाषावार राज्य रचनेच्या मागणीमुळे मराठी आणि गुजराती भाषिकांत वेगवेगळ्या राज्यांसाठी मागणी वाढू लागली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने वेग घेतल्यावर अनेक आंदोलने झाली आणि अनेकांचा बळीही गेला. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. महाराष्ट्र दिनासोबतच 1 मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे. 1886 साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतातही कामगार अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवत होते. कार्यकर्त्यांचे नेतृत्व डाव्यांकडून केले जात होते. त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर 1 मे 1923 रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला.



