सोलापूर

सोयाबीनला पीकविमा, कांद्याला हमीभाव द्या; डिझेल तुटवडा, खत-बियाणे व इंधन दरवाढ तात्काळ कमी करा — अन्यथा जनआक्रोश तीव्र करू : खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर ( प्रतिनिधी )सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौक, सोलापूर येथे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सोयाबीन पीक विमा, कांद्याला हमीभाव, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ, इंधन तुटवडा, खत-बियाण्यांच्या वाढत्या किंमती, महागाई तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भाजप महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप व महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी आज अत्यंत संकटात असून भाजप महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजावर मुद्दाम संकट आणले जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. डिझेलचे वाढते दर आणि इंधन तुटवड्याचा थेट परिणाम शेतीवर होत असून शेतकऱ्यांना शेती मशागत करणेही अवघड झाले आहे.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “खते वापरू नका” असे केलेले वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. खते वापरायची नाहीत तर शेती करायची कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, सोयाबीन, तूर आणि कांद्यासारख्या पिकांना हमीभाव मिळत नाही, पीक विमा मिळत नाही आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. देशात युद्ध नसतानाही महागाईचा प्रचंड भडका उडाला असून सामान्य माणूस आणि शेतकरी यांना त्याची मोठी झळ बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांमुळे देशातील परिस्थिती बिकट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांच्या वाळू तस्करीमुळे आणि नदीपात्रातील वाळू उपशामुळे शेतीपर्यंत पाणी पोहोचण्यात विलंब होत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे सरकार केवळ उद्योगपतींसाठी काम करत असून सामान्य माणूस आणि शेतकरी यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीकाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.

आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी आणि
उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केले. याबाबत बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ही फक्त सुरुवात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जनआक्रोश आणखी तीव्र होणार आहे. आम्ही झुकणार नाही आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

या देशाचा कणा शेतकरी आहे. शेतकरी संकटात असताना आम्ही गप्प बसणार नाही. भाजप महायुती सरकार पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा अधिक तीव्र होईल. ये तो झांकी है, आगे और लड़ाई बाकी है, असा इशाराही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.

सरकारने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असली तरी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. ही रस्त्यावरची लढाई असून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

यावेळी सोलापूर पूर्व जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, तालुका अध्यक्ष उत्तर सोलापूर अध्यक्ष भारत जाधव, दक्षिण सोलापूर अध्यक्ष भीमाशंकर जमादार, पंढरपूर अध्यक्ष संदीप पाटील पंढरपूर, मंगळवेढा अध्यक्ष प्रशांत साळे, मोहोळ अध्यक्ष सुलेमान तांबोळी मोहोळ, मोहोळ शहर अध्यक्ष किशोर पवार, मंगळवेढा शहर अध्यक्ष अँड. राहुल घुले, प्रदेश सचिव शाहिनताई शेख, अँड. रवीकरण कोळेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बळोरगी, माजी महापौर सुशिलाताई आबुटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, मनोज यलगुलवार, माजी सदस्य जिल्हा परिषद, सचिन गुंड, मुस्तफा बळोरगी, काकासाहेब पाटील जेऊर, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, दक्षिण युवक अध्यक्ष अनंत म्हेत्रे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, गजानन जक्कीकोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button