संविधान हेच रक्षाकवच -खासदार प्रियांका गांधी

बेळगाव :भाजप सत्तेसाठी, राजकारणासाठी संविधान बदलण्याचा आणि संपविण्याचा प्रयत्न करत आहे. संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुमचा होणारा अवमान सहन करू नका, जीव देईन पण संविधान बदलू देणार नाही, आम्ही देश व संविधानासाठी जीव समर्पित करण्यास
तयार आहोत, संविधान न्यायाचा अधिकार देते, संविधान हेच आपल्या सर्वांचे रक्षाकवच असून त्यापेक्षा मोठे काही नाही. त्यामुळे सर्वांनी हक्कासाठी, समतेसाठी केंद्र सरकारविरोधात लढले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रधान कार्यदर्शी खासदार प्रियांका गांधी यांनी केले.
बेळगावात महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त मंगळवार दि. २१ रोजी काँग्रेस आणि राज्य
सरकारच्यावतीने सीपीएड मैदानावर आयोजित केलेल्या ‘जय बापू जय भीम जय संविधान मेळाव्यात खासदार प्रियांका गांधी बोलत होत्या. सुरुवातीला प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राज्याचे प्रभारी कार्यदर्शी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी केले. त्यानंतर केपीसीसी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार प्रियांका गांधी यांचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते शाल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने देशातील ही पवित्रभूमी आहे. या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथे अनावरण करण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर अक्कमहादेवी आणि बसवण्णा यांचे चित्र आहे. त्या माध्यमातून कर्नाटकातील एकात्मतेचे दर्शन घडते. समानता दिसून येते. सत्य तत्त्वावर म. गांधीजींनी सत्याग्रह केला, अहिंसा आणि सत्य या दोन तत्त्वांवर देशाचा स्वातंत्र्यलढा लढला गेला. देशातील हा एकमेव लढा आहे. जो अहिंसेच्या माध्यमातून तडीस गेला आहे.त्यानंतर एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी, एआयसीसी कार्यदर्शी के. सी. वेणुगोपाल प्रभारी कार्यदर्शी रणदीपसिंग सूरजेवाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व मान्यवरांच्या हस्ते चरखा फिरवून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा संविधान विरोधी आहेत. स्वातंत्र्य मिळाल्याने डॉ. आंबेडकरांचे पवित्र संविधान देशाला मिळाले. समाजाला न्याय लोकशाहीची सुरक्षा, न्याय मागण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार देते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसमेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अवमान केला आहे अशी टिका खासदार प्रियांका गांधी यांनी केली.