टॉप न्यूज

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांच्या संख्येत वाढ !

बहुरंगी लढत होण्याची शक्यता !
 अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड )राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षानी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सध्या विविध पक्षाच्या नेत्यानी भावी आमदार म्हणून आपले बॅनर सर्वत्र लावल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांची संख्या वाढली असून बहुरंगी लढतीची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
 राज्यात ऑक्टोबर महिन्यात  विधानसभेची निवडणूक होणार असल्याचे संकेत असून या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा महायुतीमध्ये सामना रंगणार आहे. तसेच इतर राजकीय पक्षानी रासप मनसे वंचित बहुजन आघाडी आरपीआय बसपा या पक्षानी आपला उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना रंगत आला आहे.  पण सध्याच्या राजकारणात मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत असून कोणत्याच राजकीय पक्षाला विजयाची खात्री राहिलेली नाही. काँग्रेस महाविकास आघाडी कडून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच भाजपा महायुतीकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व  माजी आमदार सिद्रामाप्पा पाटील यांचे पुत्र रमेश पाटील हे इच्छुक आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच मल्लिकार्जुन पाटील यांचे समर्थक हे भावी आमदार म्हणून या नेत्यांचा उल्लेख करत आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी व रमेश पाटील यांचा उल्लेख हा भावी आमदार म्हणूनच त्यांचे समर्थ करत आहेत. यासोबतच मनसेचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील रासपचे सुनील बंडगर यांचीही भावी आमदार म्हणून समर्थकांकडून पोस्ट सुरू आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी बसपा आरपीआय या पक्षाकडून उमेदवारांचा शोध सुरू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटन कडूनही सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे हेही रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भावी आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित पाहता मामुम फॅक्टर एखाद्या उमेदवाराला घरी बसू शकतो. मागासवर्गीय समाज मुस्लिम समाज मराठा समाजाने ठरविले तर आमदार होणे सोपे होणार आहे. त्यामुळे मामुम  फॅक्टरचा धसका सर्वांनीच घेतला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जातीय राजकारणाची समीकरणे पाहता या मतदारसंघात मत विभाजन झाले तर भाजपा तसेच काँग्रेस पक्षास याचा जबर फटका बसू शकतो. विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दीड महिने शिल्लक असून या कालावधीत नाट्यमय राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारास ९ हजाराचे मताधिक्य  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. हे अल्प मताधिक्य काँग्रेस पक्षाला उभारी देणारे ठरले आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा  उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना ४७ हजार मताचें मताधिक्य होते. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारास ९ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. भाजपा व काँग्रेससह विविध पक्षात भावी आमदारांची संख्या वाढली असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात या उमेदवारांची चर्चा आतापासूनच रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button