सामाजिक
लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा लागणार कस !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची लगबग सुरू असून निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षानी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीतील लोकशाहीच्या उत्सवात मतदारांचा कस लागणार असून योग्य उमेदवार निवडीचे आव्हान मतदारांसमोर असणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ही राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती व काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडी यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे .तसेच वंचित बहुजन आघाडी , राष्ट्रीय समाज पक्ष, मनसे, एमआयएम , बसपा, आरपीआयचे इतर गट ही या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याने ही विधानसभा निवडणुकी बहुरंगी होणार आहे .बहुरंगी लढाईमध्ये उमेदवार निवडताना मात्र मतदारांचा कस लागणार आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर योजना आणि घोषणांचा पाऊस पाडला होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध योजना तसेच इतर योजनांच्या घोषणा महायुतीच्या सरकारने केल्या आहेत. महायुती सरकारच्या या योजनांबाबत महाविकास आघाडी कडून प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षाकडून टीका ही सरकारच्या विविध योजनांवर करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षातील राज्यातील राजकीय वातावरण, लोकसभा निवडणुकीतील वातावरण याचाही परिणाम विधानसभा निवडणुकीत जाणवणार का ? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. राज्यात सर्वच मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असून अनेक मतदारसंघात मत विभाजनाचा फटका हा प्रस्थापित पक्षाला बसणार आहे. राज्यातील मराठा आणि धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी, त्यासाठी झालेले आंदोलने याचाही परिणाम विधानसभा निवडणुकीत जाणवणार का ? याचीही चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. तो मतपेटीतून आपले प्रतिनिधि निवडत असतो. लोकशाहीतील हा मतदार राजा सध्या संभ्रमाअवस्थेत आहे. राजकारणाची बदलत चाललेली समीकरणे ,सत्तेसाठी पक्ष बदलणारे नेते , हिन पातळीवरचे व्यक्ती द्वेषी राजकारण, सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करणारे नेते यामुळे मतदार राजा हा चक्रावून गेला आहे. आपल्या कल्याणसाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा शोध हा मतदार राजा घेत आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजाचा कस लागणारा असून मतदार राजा हा सत्तेवर कोणाला बसविणार हे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.