राजकीय
दुधनीतील पराभवाचे आत्मचिंतन करणार – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये खरे श्रेय हे कार्यकर्त्यांचे आहे . नगर परिषदेच्या निवडणूकीत सगळ्यात मोठा विजय हा अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत झाला आहे. मैंदर्गी मध्ये कोणत्याच पक्षाने आज पर्यंत सत्ता मिळविली नव्हती. १३५ वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर राजकीय पक्षाने स्थानिक गटाचे गड उध्वस्त करून एकहाती सत्ता मिळवली आहे. मी सर्वच कार्यकर्त्यांचें आभार व्यक्त करतो. एक मोठा विजय आज भाजपाला मिळाला आहे असे असे मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले दुधनीची खंत राहिली आहे. दुधनी भाजपाचा झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करणार आहे. अक्कलकोट , मैंदर्गी नगर परिषद निवडणूकीत एवढा मोठा विजय मिळाला आहे . तरीही दुधनीत आम्हाला यश का मिळाले नाही यावर चर्चा करणार आहे. विरोधी पक्ष उभ्या महाराष्ट्रात नाही .आमची लढत ही महायुतीतील घटक पक्षासोबत झाली आहे. राज्यातील जनतेने विरोधी पक्षातील सर्वांनाच झिडकारले आहे. राज्यात भाजपा हा नंबर वन आहे. अक्कलकोटात ही भाजपाच नंबर वन आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे राज्य अध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपास घवघवीत असे यश मिळाले आहे. भाजपाने जिल्ह्यात सर्वत्र पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी अक्कलकोट , दुधनी , बार्शी या तीनच नगरपालिका भाजपाच्या ताब्यात होत्या. आता नगरसेवकांची संख्या ही वाढली आहे. नगराध्यक्ष बाबतीत अपेक्षित यश मिळाले नाही. पण पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला प्रयत्न आम्ही केला होता. नगराध्यक्ष जरी कमी आले तरी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चिन्हावर भाजपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. शिंदे सेना सोबत युती होईल अशी परिस्थिती जिल्ह्यात नव्हती. यामुळे त्यांच्यासोबत युती झाली नाही. जिल्ह्याच्या राजकारणात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस , शिवसेना ठाकरे गट , राष्ट्रवादी शरद पवार गट कुठेच दिसत नाही असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शेवटी सांगितले.




