महाराष्ट्र
राज्यात दस्त नोंदणी महागली; मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

मुंबई -महाराष्ट्र राज्यात मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान 20 रुपयांवरून थेट 40 रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे. महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे घर खरेदीदार आणि इतर मालमत्ता व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. नुकतीच नोंदणी शुल्कात वाढ झालेली असताना, हाताळणी शुल्कातही वाढ का करण्यात आली, असा प्रश्न ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ने उपस्थित केला आहे.
नोंदणी मुद्रांक विभागाच्या म्हणण्यानुसार, वाढलेली उपनिबंधक कार्यालये, संगणकीकरणाचा वाढता व्याप, 35 विविध प्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क देखभाल खर्चामुळे विभागाचा परिचालन खर्च वाढला आहे. कुशल मनुष्यबळावरील खर्चही वाढला आहे, त्यामुळे ही शुल्कवाढ करण्यात आल्याचे संकेत आहेत.
राज्य सरकारला दस्त नोंदणीतून सरासरी दरमहा सुमारे 4000 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता या हाताळणी शुल्कातील वाढीमुळे सरकारच्या तिजोरीत आणखी भर पडणार आहे. या दरवाढीमुळे नेमकी किती महसुली वाढ होईल, याची आकडेवारी लवकरच उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.