मनोरंजन
ज्युबिलीस्टार अभिनेते राजेंद्रकुमार

- हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब घेऊन आलेले अभिनेते म्हणजे ज्युबिलीस्टार राजेंद्रकुमार. आज दि. १२ जुलै राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिवस.
हिंदी चित्रपटजगत आणि भारताचे स्वातंत्र्य यांच्यात फार मोठे नाते आहे. भारताच्या फाळणीने अनेक चित्रपट कथानकांना जन्म दिला आहे. तसेच या फाळणीने अनेकांचे सर्वस्वदेखील हिरावून घेतले आहे. असाच फाळणीने सर्वस्व हिरावलेला युवक राजेंद्रकुमार तुली.
२० जुलै १९२९ ला एकसंघ भारताच्या सियालकोट येथे जन्म झाला. आजोबा सैन्यदलात कॉन्ट्रॅक्टर तर वडीलांचा सिंध प्रांतात कपड्यांचा मोठा व्यवसाय. म्हणजे अगदी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्म झाला. मात्र स्वातंत्र्याची किंमत चुकविण्यासाठी भारताची फाळणी झाली आणि हे संपन्न घर एकादिवसात निर्वासित झाले. त्यांना घर, व्यवसाय सोडून स्वतंत्र भारतात यावे लागले. राजेंद्रकुमारदेखील परिवारासोबत आले. हातात काम नव्हते, त्यामुळे ठरविले की चित्रपटातसृष्टीत काम करु. पण मुंबईला येण्यासाठी भाड्यालादेखील पैसे नव्हते. शेवटी हातातले घड्याळ विकून त्यांना ६५ रुपये मिळाले. फ्रंटयिर मेल पकडून दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजेंद्रकुमार यांनी स्वप्ननगरी मुंबई पाऊल ठेवले. आल्यावर कामदेखील लगेच मिळाले. सुप्रसिध्द दिग्दर्शक एच.एस.रवैल यांनी त्यांना सहाय्यक म्हणून नोकरी दिली. त्यांच्यासोबत दिग्दर्शनाचे काम करत असताना निर्माते देवेंद्र गोयल यांची त्यांच्यावर नजर पडली आणि त्यांनी राजेंद्रकुमार यांना जोगन या चित्रपटात अभिनय करण्याविषयी विचारले. दिलीपकुमार आणि नर्गिस यांच्याबरोबर अभिनय करण्यासाठी राजेंद्रकुमार उभे राहिले. साल होते १९५५. या चित्रपटासाठी त्यांना मानधन मिळाले १५०० रुपये. चित्रपट सुपरहिट झाला आणि एका रात्रीत हिंदी चित्रपटसृष्टीला एक स्टार मिळाला राजेंद्रकुमार.
कारकिर्दीतला पहिलाच चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्यांना चित्रपटांच्या अनेक ऑफर आल्या आणि प्रत्येक चित्रपट ते स्वीकारत गेले. यातच एक चित्रपट होता महबूब खान यांचा मदर इंडिया (१९५७). यात राजेंद्रकुमार यांच्यासोबत सुनिल दत्त, राजकुमार आणि नर्गिस होते. सर्व एकाच वयाचे होते पण चित्रपटात नर्गीसने राजेंद्रकुमार व सुनील दत्त यांच्या आईची तर राजकुमार यांनी वडीलांची भूमिका केली होती. राजेंद्रकुमार सियालकोटला राहत होते तेव्हा त्यांचे एका मोठ्या महालाएवढे घर होते पण मुंबईत रहायला घरदेखील नव्हते. याचवेळेस कार्टर रोडवर असलेल्या एका रिकाम्या बंगल्याची माहिती मिळाली. त्या बंगल्याला लोक भूतबंगला म्हणत असत, पण राजेंद्रकुमार यांनी तो बंगला खरेदी करण्याचे ठरविले. बंगल्याच्या किंमतीएवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते तेव्हा मदतीला धावून आले निर्माता बी.आर.चोपडा. त्यांनी पुढील तीन चित्रपटांचे मानधन अॅडव्हान्स म्हणून राजेंद्रकुमार यांना दिले. या तीन चित्रपटातील एक चित्रपट होता कानून.
या घरात राहयला गेल्यापासून राजेंद्रकुमार यांचे नशीबच पालटले. त्यानंतरच्या त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले. त्यांचा चित्रपट सिनेमागृहात लागला की, लवकर जात नसे. एकदा तर असे झाले की, एकाचवेळी त्यांचे 6 – 7 चित्रपट वेगवेगळ्या चित्रपटात 25 आठवडे म्हणजे सिल्व्हर ज्युबली गाठणारे ठरले. तेव्हापासून त्यांचे नाव ज्युबिलीस्टार राजेंद्रकुमार असे पडले. हे चित्रपट होते साजन बिना सुहागन, कानून, गुंज उठी शहनाई, बिन फेरे हम तेरे, गंवार.
त्यानंतर त्यांचे धुल का फुल (1959), दिल एक मंदिर (1963), मेरे महबूब (1963), संगम (1964), आरजू (1965), प्यार का सागर, गहरा दाग, सूरज (1966) आणि तलाश (1967) हे चित्रपट सुपरहिट झालेत. यातील दिल एक मंदिरसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचे फिल्मफेअर, आई मिलन की बेला आणि आरजूसाठी नामांकन तर संगमकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेअर मिळाले.
गुंज उठी शहनाई या चित्रपटात त्यांना शहनाईवादकाची भूमिका करायची होती. त्यासाठी त्यांनी शहनाई शिकली नाही पण उस्ताद बिस्मिला खां यांची मदत घेतली. त्यांना शहनाई वादन करताना पाहून त्यांनी त्याप्रमाणे अभिनय केला. चित्रपट सिनेमागृहात लागल्यानंतर बिस्मिलाखां चित्रपट पहायला गेले आणि त्यांनी राजेंद्रकुमार यांच्या अभिनयाची तारीफ करत म्हटले, की आपने हुबहू हमारा हुनर परदेपर दिखाया. आप फिल्म में कहा थे मैने तो फिल्म में सिर्फ खुद को देखा.
१९७२ दरम्यान मात्र हिंदी चित्रपटसृष्टी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे याचा अनुभव राजेंद्रकुमार यांना यायला लागला. त्यांचे चित्रपट फारसे चालत नव्हते. कारण होते चित्रपटसृष्टीत आलेला नवा कलाकार राजेश खन्ना. लोकांना आता त्याचे चित्रपट आवडू लागले होते. त्याचा आराधना चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर तर त्याने राजेंद्रकुमार यांच्यासमोर त्यांचा बंगला विकत घेण्याची इच्छा दाखवली. कारण त्याला वाटत होते की, या घरात आल्यानंतर जसे राजेंद्रकुमार ज्युबिलीस्टार झाले तसेच यश आपल्यालाही मिळावे. राजेश खन्नाशी स्पर्धा सुरु झाल्यानंतर मात्र त्यांनी चरित्र भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली तसेच त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटातूनही भूमिका केल्यात.
आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत राजेंद्रकुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली. मुलगा कुमार गौरव याच्यासाठी त्यांनी 1981 मध्ये लवस्टोरी या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाला घवघवीत यश मिळाले. कुमार गौरव स्टार झाला पण पुढे मात्र त्याचे चित्रपट काही फारसे चालले नाहीत.
त्यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या ८ दिवस आधी १२ जुलै १९९९ ला त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांना भारत सरकारने 1969 मध्ये पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला होता. तसेच कानून या हिंदी चित्रपटाकरिता व मेहंदी रंग लाग्यो या गुजराती चित्रपटाकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.



