सोलापूर
१४ मे रोजी अक्कलकोटमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती चार महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या १४ मे रोजी अक्कलकोट येथे होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार असून विविध स्तरावर याच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
या प्रकल्पांमध्ये सुरत–चेन्नई महामार्गाचा भाग असलेल्या नाशिक–अक्कलकोट महामार्गासह वळसंग–मोहोळ, वागदरी–अक्कलकोट आणि अक्कलकोट–तोळणूर या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी अधिक वेगाने जोडला जाणार असून व्यापार, उद्योग, पर्यटन आणि कृषी वाहतुकीला मोठी चालना मिळणार
आहे.
सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. गुजरातमधील सुरतपासून तामिळनाडूतील चेन्नईपर्यंतचा हा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाला जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई–पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
नाशिक–अक्कलकोट मार्गामुळे
उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील संपर्क अधिक गतिमान होणार आहे.
तसेच वागदरी–अक्कलकोट आणि अक्कलकोट–तोळणूर मार्गामुळे कर्नाटक सीमावर्ती भागाशी जोडणी मजबूत होणार आहे. मोहोळ–वळसंग हा मार्ग तर सोलापूर जिल्ह्यासाठी बाह्यवळण रस्ता म्हणून महत्त्वाचा ठरणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पांमुळे अक्कलकोट परिसरातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. स्वामी समर्थ मंदिर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक वेगवान आणि सुरक्षित प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.
तसेच ग्रामीण भागातील कृषी मालाची वाहतूक, औद्योगिक गुंतवणूक आणि
स्थानिक रोजगारनिर्मितीलाही गती
मिळण्याची अपेक्षा आहे.
या महामार्गांसाठी हजारो कोटी रुपयांचा
निधी मंजूर करण्यात आला असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी आहेत.
भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक यंत्रणांकडून तयारी सुरू असून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.




