महाराष्ट्र

मी माफी मागणार नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी घातक!” हक्कभंग समितीसमोर कुणाल कामरा याचा स्पष्ट नकार

 

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे गायल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांची गुरुवारी, ९ एप्रिल रोजी विधान भवन येथे हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडली. गेल्या महिन्यात मुख्य तक्रारदार व भाजप नेते प्रवीण दरेकर गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, यावेळी कुणाल कामरा आपल्या दोन वकिलांच्या समवेत स्वतः हजर राहिले. समितीचे प्रमुख आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण उलटतपासणी झाली. आजारी असल्याकारणाने शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे या सुनावणीस येऊ शकल्या नाहीत.

सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार प्रसाद लाड यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ही कुणाल कामरा यांची तिसरी किंवा चौथी सुनावणी होती. यावेळी तक्रारदार प्रवीण दरेकर आणि संबंधित कॉमेडियन या दोघांचेही अधिकृत जबाब नोंदवण्यात आले. चौकशीदरम्यान कुणाल कामरा यांना संविधानातून मिळालेले अधिकार, हक्कभंग समितीचे विशेषाधिकार आणि त्यांच्या चुकांसंदर्भात एकूण २४ प्रश्न विचारले गेले. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. समितीने त्यांना असाही एक प्रस्ताव दिला की, जर त्यांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली किंवा माफी मागितली, तर या प्रकरणाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला जाऊ शकतो. त्यावर त्यांच्या वकिलांनी अशी माहिती दिली की, ते या विषयावर चर्चा करून समितीला ई-मेलद्वारे आपला अंतिम निर्णय कळवतील.

मात्र, या सुनावणीनंतर काही वेळातच कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर आमदार प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ शेअर करून आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी लिहिले, “आदरणीय सर, आपल्या संवादात काही अडचण आली असावी, पण मला माझ्या उलटतपासणीतील शेवटच्या ३ प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आठवतात.” मला विचारण्यात आले की माझ्या कृत्याचा पश्चात्ताप वाटतो का? आणि मी दिलगीर आहे का? या दोन्ही प्रश्नांवर माझे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच होते. तिसरा प्रश्न बिनशर्त माफी मागण्याबाबत होता, ज्यावर मी उत्तर दिले की, मी कोणतीही माफी मागू शकत नाही कारण ती मनापासून आणि प्रामाणिक नसेल. शिवाय, मी अशी माफी मागितल्यास इतर कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तो एक अत्यंत चुकीचा पायंडा पडेल. त्यांच्या या थेट आणि निर्भीड पवित्र्यामुळे आता हक्कभंग समिती या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button