सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांची लोकसभेत मदतीची मागणी

नवी दिल्ली – सोलापूर जिल्ह्यात व लोकसभा मतदारसंघातील तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, हरभरा, पेरू, कांदा, खरबूज तसेच गुलाब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर तरकारी भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच पश्चिम आशियातील संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी मार्गावरील आयात-निर्यात विस्कळीत झाल्याने शेतीमाल अडकून पडला आहे. व्यापारी खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. त्यातच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी केंद्र सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या:
1. तातडीच्या गरज असलेल्या भागात NDRF मार्फत मदत पोहोचवावी
2. नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी.
3. तरकारी भाजीपाला व फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी,
4. बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी
5. कांद्याला प्रति क्विंटल १,००० रुपयांचे अनुदान द्यावे
6. शेतकऱ्यांना डिझेल बॅरलमध्ये देण्यावरील बंदी उठवावी
7. NCAP फंडातील अनियमिततेची चौकशी करावी
शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी ठामपणे मांडली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मौजे येवती येथे द्राक्ष, केळी, डाळिंब, चिक्कू आदी फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती गोळा करून ती खासदार शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली होती.


