भोंदूबाबा खरातचे फुटेज मिळतात मग दादांचे का नाही? अमोल मिटकरींचा सवाल

मुंबई – आज विधानसभेत ९ सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील तीव्र खंत उघडपणे बोलून दाखवली. सभागृहात आज दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सविस्तर चर्चा होईल अशी त्यांना मोठी आशा होती. मात्र, तसे न झाल्याने आपल्यासारखा एक निष्ठावान कार्यकर्ता कुठे तरी कमी पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सरकारवर थेट टीकास्त्र सोडताना अमोल मिटकरी म्हणाले की, नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरात याचे इतके सीसीटीव्ही फुटेज अगदी सहज सापडतात, मग अजितदादांच्या विमान अपघाताचे एकही फुटेज कसे उपलब्ध होत नाही? सीआयडी चौकशीमध्ये आतापर्यंत नेमके किती जबाब नोंदवण्यात आले, असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला. विमानातली कागदपत्रे जळत नाहीत, मात्र ब्लॅकबॉक्स कसा जळून खाक होतो, याबद्दल त्यांनी दाट संशय व्यक्त केला. सरकारला या विमान अपघाताचे कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप करत, जोपर्यंत श्वास आहे तोवर ही सल मनात कायम राहील, असे ते भावूक होत म्हणाले.
अशोक खरात बद्दल संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, ही केवळ एक व्यक्ती नसून विकृती आहे. त्याचा खरा चेहरा समाजासमोर आल्यावरच लोकांच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. तो केवळ अशोक खरात असल्यामुळेच त्याचे कृत्य झाकून घेतले जात आहे. एखाद्या कुत्र्याला भगवा रंग लावला म्हणजे तो साधू बनत नाही, असा घणाघात त्यांनी केला. ज्या समाजसुधारकांनी आयुष्य वेचले, त्या महाराष्ट्रामध्ये अशी नकली लोकं पुढे येत असल्याबद्दल खंत व्यक्त करत, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने तातडीने नवा अध्यादेश काढावा अशी मागणी त्यांनी केली.
सभागृहात महिला आमदारांची संख्या जास्त असती तर दादांच्या अपघाताचा विषय नक्कीच निघाला असता. बारामतीचे नागरिक अत्यंत सुजाण असून, दादांच्या अनुपस्थितीत काँग्रेसनेही निवडणूक लढवली नसती, त्यामुळे तिथली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे सांगत शंभूराज देसाई यांच्यासाठी ज्याप्रमाणे सर्व शिवसेना एकवटली, तसा एकोपा दादांच्या बाबतीत का दिसला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तुषार दोषी हे पात्र अत्यंत वादग्रस्त असून त्यांनी अंतरवली सराटी मध्ये जे केले ते इतिहासाला न समजणारे आहे. सातारा मधील दोन्ही पक्षांचे नेते पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तसाच लढा दादांसाठी दिसला असता तर अधिक आवडले असते. सत्ताधारी पक्ष किंवा मित्रपक्ष दादांबद्दल का बोलत नाहीत? २०२९ च्या निवडणुकीत जनता कोणालाही माफ करणार नाही, असा इशारा देत अजून १ दिवस शिल्लक असून सर्वांनी दादांसाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.


