सोलापूर
श्रीकाशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्र होणार सोलापुरात
डॉ. शैलेश पाटील यांनी दिला थ्री बीएचके फ्लॅट
सोलापूर ( प्रतिनिधी ) : श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापुरात श्रीकाशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्राची घोषणा केली. सोलापुरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश जगदीश पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मनीषा शैलेश पाटील यांनी काशीपीठाला थ्री बीएचके फ्लॅट अर्पण केला. पिताजी जगदीशचंद्र मल्लिकार्जुन पाटील आणि माताजी जयश्री जगदीशचंद्र पाटील यांच्या आशीर्वादाने डॉक्टरांनी ही देणगी महास्वामीजींना अर्पण केली. डॉ. शैलेश हे काशीपीठाच्या श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहेत.
काशीपीठाचे ८४ वे जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजींनी विद्यार्थी असताना मोठा ग्रंथ संग्रह केला. पुढे संशोधन केंद्र निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न विद्यमान जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी पूर्ण करीत आहेत. सोलापुरात संत साहित्य संशोधन केंद्र व्हावे असा मानस अनेक वर्षांपासून होता. यासाठी वीरशैव साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सर्जे यांनी महास्वामीजींच्या चरणी प्रार्थना केली होती. शासन स्तरावरही पाठपुरावा सुरू होता. महास्वामीजींनी हा फ्लॅट या कार्यासाठी देण्याचे निश्चित केले. सुसज्ज ग्रंथालय, संशोधकांना राहण्याची जागा, बैठकीची जागा, वरील बाजूस सेमिनार हॉल असे नियोजन करण्याचा निर्धार महास्वामीजींनी व्यक्त केला आहे.
वाराणसी येथील काशीपीठामध्ये ज्ञानमंदिर ग्रंथालय आहे. विविध भाषा आणि विषयांचे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध आहेत. ९००० पेक्षा अधिक मुद्रित ग्रंथ ३०० पेक्षा जास्त दुर्मिळ हस्तलिखिते उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथांचे डिजिटल स्वरूप शंकर मुखर्जी यांनी केले आहे. या संशोधन केंद्रात हे सर्व ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्याची पिढी वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे. त्यांचाही विचार करून मुद्रित आणि डिजिटल ग्रंथ या संशोधन केंद्रात उपलब्ध होतील.
संत साहित्याच्या सर्व अभ्यासकांसाठी ही पर्वणी राहणार आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून सर्व संप्रदायांच्या संतांचे अध्ययन आणि संशोधन होणार आहे. ज्या अभ्यासकांकडे दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांनी या संशोधन केंद्रासाठी ग्रंथ अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच हे संत साहित्य संशोधन केंद्र संशोधकांसाठी खुले करण्यात येईल अशी घोषणा महास्वामीजींनी केली आहे.



