भगवान गौतम बुद्धाचीं शिकवण

गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण शिकवणीत हिंसा आणि युद्धाला स्पष्ट विरोध केला आहे. त्यांच्या मते युद्ध हे माणसाच्या लोभ, द्वेष आणि अहंकारातून निर्माण होते. बुद्धांनी सांगितले की युद्ध करून कधीही खऱ्या अर्थाने शांती मिळत नाही. उलट युद्धामुळे समाजात द्वेष, दुःख आणि विनाश वाढतो.
बुद्धांनी धम्मपदात सांगितले आहे की द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो फक्त प्रेम आणि करुणेनेच संपतो. म्हणूनच त्यांनी माणसांना करुणा, मैत्री आणि अहिंसा या मूल्यांचा मार्ग दाखवला. त्यांच्या मते युद्धात कोणीही खरा विजेता नसतो. जो जिंकतो तो द्वेष निर्माण करतो आणि जो हरतो तो दुःख भोगतो. त्यामुळे विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टींपलीकडे जाऊन शांततेचा मार्ग स्वीकारणे हेच श्रेष्ठ आहे.
बुद्धांच्या जीवनात एक प्रसिद्ध घटना आहे जी त्यांच्या या विचारांचे प्रत्यक्ष उदाहरण मानली जाते. ती म्हणजे रोहिणी नदीचा प्रसंग.
बुद्धांच्या काळात दोन गणराज्ये होती. शाक्य आणि कोलिय. शाक्य हेच ते लोक होते ज्यांच्यात बुद्धांचा जन्म झाला होता. या दोन राज्यांच्या सीमेवरून रोहिणी नावाची नदी वाहत होती. दोन्ही राज्यातील शेतकरी आपल्या शेतीसाठी त्या नदीच्या पाण्यावर अवलंबून होते.
एकदा दुष्काळामुळे नदीतील पाणी कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. शाक्यांचे शेतकरी म्हणत होते की पाणी आम्हाला जास्त मिळाले पाहिजे, तर कोलियांचे शेतकरी म्हणत होते की नदी आमच्या बाजूनेही वाहते त्यामुळे आम्हालाही समान हक्क आहे. हा साधा वाद हळूहळू वाढत गेला आणि तो दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि नंतर राजांपर्यंत पोहोचला.
दोन्ही बाजूंनी हट्ट धरला आणि परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही राज्यांनी सैन्य गोळा केले. रोहिणी नदीच्या काठावर दोन्ही बाजूंची सैन्ये उभी राहिली आणि युद्ध होण्याची पूर्ण तयारी झाली. थोड्याशा पाण्याच्या प्रश्नावर हजारो लोकांचे जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बातमी कळल्यावर बुद्ध त्या ठिकाणी आले. त्यांनी दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाऊन राजांना आणि सैनिकांना थांबवले. त्यानंतर त्यांनी दोन्ही बाजूंना शांतपणे विचारले की या नदीच्या पाण्याची किंमत किती आहे. लोकांनी सांगितले की पाणी महत्त्वाचे असले तरी त्याची किंमत फार मोठी नाही.
मग बुद्धांनी विचारले की मानवी जीवाची किंमत किती आहे. तेव्हा सर्वांनी उत्तर दिले की मानवी जीव अमूल्य आहे.
त्यावर बुद्ध म्हणाले की जर मानवी जीव इतका मौल्यवान आहे तर थोड्याशा पाण्यासाठी इतक्या लोकांचे जीव घेणे योग्य नाही. राग, लोभ आणि अहंकारामुळे तुम्ही निरर्थक युद्ध करायला तयार झाला आहात.
बुद्धांचे हे शब्द ऐकून दोन्ही बाजूंना आपली चूक लक्षात आली. शेवटी युद्ध सुरू होण्याआधीच ते थांबवले गेले आणि पाण्याचा प्रश्न शांततेने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रोहिणी नदीची ही घटना बुद्धांच्या शिकवणीचे जिवंत उदाहरण मानली जाते. या प्रसंगातून त्यांनी दाखवून दिले की जगातील अनेक युद्धे ही मोठ्या कारणांमुळे नसतात, तर माणसाच्या अहंकार आणि लोभामुळे निर्माण होतात. जर लोकांनी संयम, संवाद आणि करुणेचा मार्ग स्वीकारला तर युद्ध टाळता येते आणि समाजात खरी शांतता निर्माण होऊ शकते.



