भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी व टेक्सटाइल्स उद्योगासाठी घातक; काँग्रेस उभी करणार मोठी लढाई – खासदार प्रणिती शिंदे

नवी दिल्ली – नवी दिल्ली संसद भवन परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या करारामुळे देशातील शेतकरी आणि टेक्सटाइल्स उद्योगाचे प्रचंड नुकसान होणार असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अमेरिका-भारत व्यापार करारामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच इतर शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आयात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांनी काय करावे? देशात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे काय होणार? बळीराजाच्या कष्टाला योग्य भाव मिळणार कसा? असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले.हा करार म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम आहे. बळीराजाचे बळी घेण्याचे षडयंत्र भाजप सरकार राबवत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. सोलापूरसह महाराष्ट्रातील टेक्सटाइल्स उद्योग आधीच अडचणीत असताना, या करारामुळे स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसणार असून लाखो कामगारांच्या रोजगारावर गदा येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष देशातील शेतकरी, कामगार आणि लघुउद्योगांच्या हितासाठी मोठी लढाई उभी करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
“देशहिताच्या नावाखाली जनविरोधी निर्णय घेणे थांबवावे. हा भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी आणि उद्योगविरोधी असल्याने तो रद्द केला गेला पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच, हा करार करण्यामागे एपस्टाईन, अदानी विषय कारणीभूत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेमका कोणाचा दबाव होता? देशहितापेक्षा इतर कोणते स्वार्थ पुढे होते का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट निशाणा साधला.
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आणि उद्योगांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा निर्धार व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.



