अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना, राज्यातील बदलतं राजकीय समीकरण आणि देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे.
अग्निवीर याचिका आणि न्यायालयातील सुनावणी :अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही न्यायालयात मेंशन केले असता, कोर्टाने दुसऱ्या बाजूला नोटीस बजावून उद्या पुन्हा मेंशन करण्यास सांगितले आहे. आमचा प्रयत्न आहे की, अग्निवीरचा मुद्दा लवकरात लवकर सुनावणीला यावा. केंद्र सरकारला लष्करी भरतीचे अधिकार ‘इंडियन आर्मी ऍक्ट’ मधूनच मिळतात. ते म्हणाले की, एकदा का तुम्ही जवानाला युद्धभूमीवर (बॅटल फिल्ड) घेऊन गेलात, की त्याला आर्मी ऍक्ट लागू होतोच. त्यामुळे सीमेवर लढताना शहीद होणाऱ्या अग्निवीर जवानाला पूर्ण मोबदला आणि सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी आमची कायदेशीर लढाई सुरू आहे.
देश दुसऱ्या गोध्राकडे जातोय की काय? :देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. देशात सध्या जे द्वेषाचे राजकारण सुरू आहे, ते पाहता आपण गोधरासारख्या परिस्थितीकडे तर जात नाही ना, अशी भीती वाटते. लोकांमध्ये एकमेकांविरोधात प्रचंड द्वेष निर्माण केला जात आहे आणि दुर्दैवाने यामध्ये मीडियाचा मोठा सहभाग आहे.
महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करताना त्यांनी मीडियाने चुकीचे चित्र रंगवल्याचे सांगितले. मुस्लिम समाज आता काँग्रेससोबत राहिलेला नाही, त्यांनी एमआयएमचा पर्याय निवडला आहे. मीडिया सांगत आहे की एमआयएमच्या १२३ जागा आल्या जसं काय हे पहिल्यांदाच आलं. पण वास्तव हे आहे की जेव्हा मुस्लिम समाज काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत होता, तेव्हा मुस्लिम प्रतिनिधींची संख्या २४० ते २५० च्या आसपास असायची. म्हणजेच या निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधींच्या जागा प्रत्यक्षात कमी झाल्या आहेत, पण मीडिया मात्र सामान्य माणसाला असे दाखवण्याचा प्रयत्न करते की, मुसलमानांच्या हाती राजकारण जात आहे आणि आता हिंदूंनी सावध राहावं आणि तलवारी काढून राहावं असं राजकारण मला दिसते म्हणून मी म्हणतो की, देशभरामध्ये दुसरा गोधरा घडण्याची मला शक्यता दिसते.
मुख्यमंत्र्यांनी इतिहास वाचावा :
इतिहासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना आंबेडकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानाला हरवण्यासाठी पेशवे कोणासोबत सामील झाले होते, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा. अगदी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास वाचला तरी चालेल, म्हणजे मुख्यमंत्री अशी चुकीची विधाने करणार नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.



