सामाजिक
कवीवर्य मंगेश पाडगावकर स्मृतीदिन

मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदन -साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी ‘कथारूप महाभारत’ या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हणले आहे.मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता -अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ,अफाट आकाश ,असा बेभान हा वारा ,आतां उजाडेल ,आम्लेट ,जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारादार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड ,नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं ,प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो ,फूल ठेवूनि गेले ,मी आनंदयात्री ,मी बोलले न काही नुसतेच पाहिले ,सलाम ,सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? ,सांगा कसं जगायचं ,सावर रे, सावर रे, उंच उंच झुला ,टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले.पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता१. रिमझिम पावसात जाऊ गं,गुण गुण गाणे गाऊ गं,थेंब टपोरे आले गं,सगळे गोकुळ न्हाले गं,थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान;ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान.काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||३. या मेघांनो आभाळ भराया धरतीवर अभिषेक कराविहंगाचे मधुगान हरपलेया मातीचे श्वास करपले ||वाहु दे सुखाचा पुन्हा झरासुकून गेल्या वनांवनांवर सचिंत झाल्या मनांमनांवर करुणेची संतत धार धरा ||एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.
मंगेश पाडगावकरांचे काव्यवाचन
वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.
इ.स. १९९० च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.



